मुंबई: Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या वक्तव्यांनी नेहमीच चर्चेत असतात. शेतीपीक किमान आधारभूत किंमत निश्चितीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली होती. यात मुख्यमंत्र्यांच्या विधानाने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं.
एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून शेतकऱ्यांचे विषय हाताळण्यासाठी मी नेहमी पुढे असतो. मी गावी जातो आणि शेती सुद्धा करतो. काही लोक म्हणतात की मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने जाऊन शेती करतात पण वेळेची बचत व्हावी यासाठी मी हेलिकॉप्टरने जातो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
यावेळी त्यांनी बांबूच्या शेतीवर भाष्य केले. बांबूच्या शेतीसाठी सरकारने अनुदान देण्याचे ठरवलेलं आहे. तापमान कमी करायचं असेल तर मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड केली पाहिजे. २०२२ ला बांबू लावला होता तेव्हा लावावा लागला. यावेळी बांबू लावले नसते तर आज या बैठकीला हजर नसतो, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यांच्या या सूचक वक्तव्याची चर्चा होत आहे.
शेतकऱ्यांना दुःखी ठेवून कोणी सुखी होणार नाही. त्यामुळे आमचे सरकार शेतकऱ्यांसाठी सर्व काही करत आहे. लवकर केंद्रीय कृषिमंत्री यांची वेळ घेऊन राज्यातल्या शेतकऱ्यांच्या समस्या मांडू,असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.