Devendra Fadnavis On Lok Sabha Results | ‘…तर भाजपा स्वबळावर 310 च्या पुढे गेली असती’, निकालानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया

0

मुंबई : – Devendra Fadnavis On Lok Sabha Results | लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालाचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. राज्यात सांगली वगळता महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत झाली. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपला अपेक्षेप्रमाणे यश आले नाही. भाजपला बहुमताचा आकडा स्वबळावर गाठता आला नाही. त्यामुळे विरोधकांना भाजपवर टीका करण्यासाठी आयते कोलीत मिळाले आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या निकालावर बोलताना विविध मुद्यांवर प्रकाश टाकला.

देवेंद्र फडणवीस म्हमाले, पुन्हा एकदा देशातील जनतेने एनडीएला संपूर्ण बहुमत प्रदान केले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसर्‍यांदा भारताचे पंतप्रधान होणार आहेत. मी त्यांचे आणि देशभरातील सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो. इंडिया आघाडीतील सर्व पक्ष मिळून जितक्या जागांवर आघाडीवर आहेत, त्यापेक्षा अधिक जागा एकट्या भाजपाच्या वाट्याला आल्या आहेत. शिवाय, आंध्रप्रदेशात तेलगू देसम पार्टीच्या नेतृत्त्वात भाजप युतीला, तर ओडिशात भाजपाच्या नेतृत्त्वात दणदणीत यश मिळाले, या दोन्ही राज्यातील कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो.

उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रात आमच्या काही जागा कमी आल्या. पश्चिम बंगालमध्ये अधिक चांगले यश मिळेल, असे वाटत होते. असे झाले असते, तर भाजपा स्वबळावर 310 च्या पुढे गेली असती. देशातील जनतेने भक्कमपणे मोदीना साथ दिली आहे. संविधान बदलणार असा खोटा प्रचार करुन जागा जिंकण्याचा प्रयत्न झाला, हे या निकालाचे दुर्दैव आहे. पण, तरी निवडणुकीत जनतेचा जनादेश जसा असतो, तसाच स्वीकारायचा असतो. तो शिरसावंद्य मानायचा असतो. या निकालाचे सखोल चिंतन करुन विधानसभेत पुन्हा जनतेत जाऊन, या लोकसभेची कसर भरून काढू, असंही फडणवीस यांनी नमूद केले.

महाराष्ट्रातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आणि महायुतीतील सर्वच घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत प्रचंड परिश्रम घेतले आणि ते पुढेही करणार आहेत, मी त्यांचेही मन:पूर्वक आभार मानतो, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दाद दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.