पुणे: Sunetra Ajit Pawar | ‘एका पराभवाने आपण संपलो असे नाही. पराभवातून बाहेर या. नाराजी झटका आणि विधानसभा निवडणुकीसह आगामी निवडणुकांसाठी जोमाने कामाला लागा,’ असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीच्या पराभवानंतर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना केले आहे.
परंतु पराभवाचा जबर धक्का बसल्याने कार्यकर्ते नैराश्यातून बाहेर येण्यास तयार नाहीत. आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने पक्षातील सुस्तपणा परवडणारा नाही. याच पार्श्वभूमीवर पुणे शहरात कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर घेण्याचा ठराव वर्धापनदिनी केला आहे.
पुणे शहरातील पक्ष कार्यालयामध्ये शहराध्यक्ष दीपक मानकर (Deepak Mankar), कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख (Pradeep Deshmukh) यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वानुमते ठराव मांडण्यात आला आहे. सुनेत्रा अजित पवार यांना राज्यसभेवर नियुक्त करून त्यांना केंद्रीय राज्यमंत्रिपद देण्यात यावे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघ (Baramati Lok Sabha) व पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना बळ मिळू शकेल असे त्यामध्ये म्हंटलेले आहे.
पुढील तीन महिन्यांवर विधानसभा निवडणूक असल्याचे गृहित धरून कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी तसेच पुणे शहर आणि जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या वाढीसाठी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर संधी देऊन त्यांना केंद्रीय राज्यमंत्रिपद द्यावे, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे.