Ajit Pawar | भुजबळांपाठोपाठ अजित पवारांचाही अभ्यासक्रमातील मनुस्मृतीच्या समावेशाला थेट विरोध, म्हणाले – ‘कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी…’

0

मुंबई : Ajit Pawar | अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करण्याबाबत सरकार विचार करत असल्याची चर्चा आहे. याबाबत सरकारमधीलच मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी यास जोरदार विरोध केला आहे. त्या पाठोपाठ आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही थेट विरोध दर्शवला असून कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी हे होऊ देणार नाही, असे ठणकावून सांगितले आहे. मुंबई येथे आयोजित पक्ष कार्यकारिणी बैठकीत अजित पवार बोलत होते.

अजित पवार म्हणाले, आपण शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचाराबाबत बोलतो. मी भुजबळ साहेबांना सांगितले आहे, आपण सरकारमध्ये आहोत, तोपर्यंत मनुस्मृतीचा निर्णय होऊ देणार नाहीत. मी दीपकला (मंत्री दीपक केसरकर) सुद्धा या संदर्भात सांगितले आहे.

अजित पवार पुढे म्हणाले, दीपक पूर्वीचा राष्ट्रवादीचाच आहे. आपणच त्याला आमदार केला. कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण आपल्या विचारधारेला ठेस पोहोचेल असा निर्णय होऊ द्यायचा नाही, अशी ठाम भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत अजित पवार म्हणाले, पाच वर्षे कितीही काही काम केले, तरी फार लक्षात ठेवलं जातं असं नाही. आपल्या येथील शॉर्ट मेमरी जगात कुठेही पाहायला मिळत नाही. अशा प्रकारची शॉर्ट आपल्या भारतीयांची आहे. ही फॅक्ट आहे.

निवडणुकीच्या तीन ते चार महिन्यात त्याच्यावर निवडणुकीचा निकाल अवलंबून असतो. त्याबद्दल आपण सर्वांनी काळजी केली पाहिजे. संघटना म्हणून आम्ही आमच्या स्तरावर काळजी घेणार आहोत. याबद्दल कोणीही तीळमात्र शंका बाळगू नका, असे पवार म्हणाले.

ते पुढे म्हणाले, मला आठवत आहे जेव्हा आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे काम करायचो. त्यावेळी आम्हाला कधीकधी सांगितले जायचे की, शिवसेनेवर टोकाची भूमिका घ्या. शिवसेनेला ठोका. महाविकास आघाडीत असताना असा विचार असायचा. मी त्यांना विचारायचो का? ते म्हणायचे शिवसेनेला ठोकल्यानंतर अल्पसंख्यांकांना समाधान मिळते. त्यांना आनंद वाटतो.

पण यावेळेस तर अल्पसंख्याक समाज शिवसेनेबरोबर जायला निघाला होता. त्यामुळे काय, कुठे, कसे गणित बदलते पाहा. यावेळेस ब्रम्हदेव जरी आला तरी सांगू शकणार नाही, असे पवार म्हणाले.

अजित म्हणाले, बीड, जालना आणि परभणी जिल्ह्यात जातीवादावर निवडणूक झाली. मराठा-मराठेत्तर असं काही गावांमध्ये सुरु झालं. अरे देश कुठे चाललाय? जग कुठे चाललय? आणि आपण जाती-पातीमध्ये अडकून बसलो आहोत, अशी नाराजी अजित पवार यांनी व्यक्त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.