नवी दिल्ली : UPI Payments | यूनिफाईड पेमेन्ट्स सिस्टम (UPI) ने भारतात डिजिटल पेमेन्टचे परिवर्तन केले आहे. रस्त्यावरील भाजीसह मोठ-मोठ्या शोरूमधील महागड्या वस्तुंपर्यंत सर्वकाही UPI/QR कोडद्वारे खरेदी करता येत आहे. परंतु, या सुविधेचा नकारात्मक परिणाम सुद्धा आहे. आयएएनएस वृत्तसंस्थेने तज्ज्ञांच्या संदर्भाने म्हटले आहे की, यूपीआयमुळे लोकांना फालतू खर्चाचे व्यसन लागत आहे. अनेकदा त्यावेळी गरज नसलेले सामानसुद्धा खरेदी केले जात आहे.
स्मार्टफोनद्वारे कोणत्याही वस्तुचे पेमेन्ट चुटकीसरशी होते, यामुळेच अनावश्यक खर्च वाढत आहे. आयआयटी दिल्लीचा एक अलीकडील सर्वे सांगतो की, यूपीआय आणि इतर डिजिटल पेमेन्ट ऑपशनमुळे सुमारे ७४ टक्के लोक गरजेपेक्षा जास्त खर्च करत आहेत.
कारण, रोख पैशांच्या तुलनेत डिजिटल मोडद्वारे पेमेन्ट करणे खुपच सोपे आहे. रोखीत अनेकदा सुट्या पैशांची समस्या होते, अथवा त्यावेळी तेवढे पैसे जवळ नसल्याने तुम्ही खरेदी करत नाही.
मार्केट इन्टेलिजन्स फर्म सीएमआरमध्ये इंडस्ट्री इन्टेलिजन्स ग्रुपचे हेड प्रभु राम यांनी म्हटले की, अशाप्रकारच्या सुविधेमुळे अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता असते, कारण हा डिजिटल मोड आहे. यामध्ये हातातून रोख रक्कम देतानासारखे, किती पैसे देतोय असे वाटत नाही.
नॅशनल पेमेन्ट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अलिकडील डेटावरून समजते की, यूपीआय ट्रांजक्शनची संख्या एप्रिलमध्ये १,३३० कोटीपर्यत पोहचली आहे. यामध्ये वार्षिक आधारावर ५० टक्के वाढ झाली आहे. मागील वर्षी यूपीआय व्यवहार जवळपास ६० टक्के वाढून विक्रमी ११,७६८ कोटीपर्यंत पोहचले होते.
तज्ज्ञांनुसार, भारतात ग्राहकांचा खर्च वाढत आहे. आता लोक कार, स्मार्टफोन, टीव्ही आणि इतर वस्तुंवर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करत आहेत. यामुळे देशाच्या आर्थिक वाढीला चालना मिळत आहे. मात्र, हे सुद्धा पाहिले जात आहे की, यूपीआयमुळे लोक जास्त किमतीच्या वस्तुंवर गरजेपेक्षा जास्त खर्च करत आहेत. हे सतत वाढत आहे.