Pune News | स्टेशनरी कटलरी अँड जनरल मर्चंट्स असोसिएशनतर्फे व्यापारी एकता दिनानिमित्त पुरस्कार वितरण

0

छोटे व्यापारी हे देशाचा आर्थिक कणा – माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर

पुणे : Pune News | बदलत्या काळानुसार लोकांच्या महत्त्वकांक्षा आणि जगण्याच्या पद्धती बदलत आहे, त्यानुसार लोकांची खरेदी करण्याची क्षमताही वाढत आहे. देशामध्ये मॉल संस्कृती आणि ऑनलाइन शॉपिंग वाढीला लागणे हे लहान व्यापाऱ्यांसाठी मोठे आव्हान आहे. लहान व्यापारी हे एक प्रकारे देशाचा आर्थिक कणा आहेत, हे व्यापारी टिकून राहण्यासाठी व्यापक प्रमाणावर प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.

स्टेशनरी कटलरी अ‍ँड जनरल मर्चंटस् असोसिएशनतर्फे व्यापारी एकता दिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळा नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते पार पडला. असोसिएशनचे माजी अध्यक्ष अंकुश काकडे, अध्यक्ष सचिन जोशी, किशोर पिरगळ, मोहन कुडचे, सूर्यकांत पाठक, मदनसिंह राजपूत, सुरेश नेऊरगावकर, नितीन पंडित, किशोर चांडक, मोहन साखरिया आदी उपस्थित होते.

असोसिएशनतर्फे देण्यात येणारा व्यापार भूषण पुरस्कार यंदा कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल यांना प्रदान करण्यात आला. तसेच उत्कृष्ट दुकान पुरस्कार खडकी येथील डी.आर.गांधी आणि कंपनीचे तुषार गांधी व सचिन गांधी, उत्कृष्ट विक्रेता पुरस्कार बुधवार पेठेतील कल्पेश टेÑडर्सचे राजेश शहा व कल्पेश शहा, फिनिक्स पुरस्कार हा तुळशीबागेतील निकीता दुकानाचे दुर्गेश नवले आणि उत्कृष्ट महिला व्यापारी पुरस्कार स्ट्रीट स्टाईलच्या केतकी सामक यांना प्रदान करण्यात आला. कै. डॉ. धनंजय व साधनाताई गोरे स्मृती पुरस्कार सिंहगड रस्त्यावरील रहिवासी गीता ओक यांना देण्यात आला. पुणेरी पगडी, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.

प्रकाश जावडेकर म्हणाले, व्यापारी छोटा असला तरी त्याचा जर ब्रँड निर्माण झाला तर तो जागतिक पातळीवर व्यवसाय करू शकतो, हे मॅकडोनाल्ड सारख्या व्यवसायाने दाखवून दिले आहे. त्यावरच वाटचाल करत कोहिनूर ग्रुपने आपली वाटचाल जागतिक स्तरावर नेली आहे. ऑनलाइन शॉपिंग आणि मॉल संस्कृतीमुळे छोट्या व्यापाऱ्यांवर अनेक मोठे संकटे निर्माण झाले आहे. परंतु त्यासाठी छोट्या व्यापाऱ्यांनीही आपल्या व्यवसाय करण्यामध्ये बदल घडवून आणले पाहिजे. काळानुसार व्यवसायामध्ये ज्याप्रमाणे बदल घडत आहेत त्याचप्रमाणे बदल घडवून जर व्यवसाय केला तर व्यवसाय निश्चितच टिकू शकत आणि आपला व्यापार हा केवळ एक छोटा व्यापार राहणार नाही तर त्याला राष्ट्रीय आणि जागतिक दर्जा मिळू शकेल.

कृष्णकुमार गोयल म्हणाले, बदलत्या काळानुसार छोट्या व्यापाऱ्यांसमोरील प्रश्नांचे स्वरूप बदलत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने व्यापारी धोरण करताना छोट्या व्यापाऱ्यांना पूरक ठरतील, अशा भूमिका घेणे गरजेचे आहे. छोटा व्यापारी टिकला तर देशातील सर्वसामान्य माणूस टिकू शकेल. माझ्या आयुष्याची सुरुवात ही स्टेशनरी व्यवसायातून झाली होती त्यामुळे या पुरस्काराचे मला विशेष कौतुक आहे. व्यापार म्हणजे केवळ पैसा कमावणे नव्हे तर व्यापाऱ्यांची सामाजिक बांधिलकी असणे ही गरजेचे आहे. व्यापाऱ्यांनी कोणतीही संधी सोडू नये तसेच प्रामाणिकपणाची कास सोडू नये तरच तुमचा व्यापार हा एक ब्रँड होऊ शकेल.

अंकुश काकडे म्हणाले, राजकारणामध्ये घराणेशाही आली तर जनतेमध्ये रोष निर्माण होतो. परंतु उद्योगधंद्यांमध्ये जर घराणेशाही असेल तर त्याचा गौरव होतो हे आपल्याला इथे दिसून येते. व्यापारांमध्ये जर घराणेशाही असेल तर ती समाजाला गरजेचीच असते.

सूर्यकांत पाठक म्हणाले, कृष्णकुमार गोयल यांनी कायम सोचोटी आणि प्रामाणिकपणाची कास धरल्यामुळे त्यांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढू शकला, त्यांचा आदर्श सर्व छोट्या व्यापाऱ्यांनी घेणे गरजेचे आहे. त्यांच्यातील चांगल्या गुणांमुळेच ते समाजातील माणसे जोडू शकले, असेही त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन दिलीप कुंभोजकर यांनी केले तर आभार नितीन पंडित यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.