Devendra Fadnavis On Ajit Pawar NCP | राष्ट्रवादी काँग्रेसला एकही मंत्रिपद नाही? फडणवीसांनी स्पष्ट शब्दात सांगितलं कारण

0

मुंबई: Devendra Fadnavis On Ajit Pawar NCP | आज देशात नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) नेतृत्वाखालील भाजपप्रणित एनडीएचे सरकार (NDA Govt) स्थापन होणार असून राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या खासदारांना पीएमओ कार्यालयाकडून (PMO Office) फोन केले जात आहेत.

यात महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पियूष गोयल, मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, प्रतापराव जाधव, रामदास आठवले यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. मात्र, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कुठल्याही खासदाराला मंत्रिपदासाठी फोन आलेला नाही. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजी असल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्रात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पाच जागांवर निवडणूक लढवली होती. परंतु, केवळ एकाच जागेवर पक्षाचा विजय झाला आहे. त्यामुळेच कदाचित त्यांना मंत्रिपद नाकारले जात आहे का? अशी शंका राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात माहिती दिली आहे.

ते म्हणाले, ” राष्ट्रवादीला सरकारच्या वतीने एक जागा ऑफर करण्यात आली होती. राज्यमंत्रिपद-स्वतंत्र प्रभार अशी ती जागा होती. पण त्यांचा आग्रह असा होता की राष्ट्रवादीकडून प्रफुल पटेल यांचे नाव निश्चित आहे आणि ते याआधी केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे राज्यमंत्री-स्वतंत्र प्रभार करता येणार नाही.

पण जेव्हा युतीचे सरकार असते तेव्हा काही निकष तयार केलेले असतात. एका पक्षाकरता ते निकष बदलता येत नाहीत. त्यामुळे मला विश्वास आहे की जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल तेव्हा त्यांचा विचार नक्की केला जाईल,” असे फडणवीसांनी स्पष्ट सांगितले.

“आताही आमच्याकडून समावेश करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. पण त्यांनीच सांगितले की यावेळी शक्य नसल्यास पुढच्या वेळी द्या, पण आम्हाला राज्यमंत्रिपदाऐवजी मंत्रिपद द्या,” अशी माहिती देखील फडणवीस यांनी दिली.

“महाराष्ट्रातून काही अनुभवी आणि काही युवा खासदारांना मोदींच्या एनडीए सरकारमध्ये संधी मिळाली आहे. त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो. नितीन गडकरी, पीयूष गोयल, रामदास आठवले, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ यांसह शिंदे गटाचे प्रतापराव जाधव हे सर्वजण मंत्रिमंडळात येत आहेत त्याबद्दल आनंद आहे. या सर्वांचे अभिनंदन करतो “, असेही फडणवीस म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.