Pune Accident News | अल्पवयीन रिक्षाचालकाच्या धडकेने युवकाचा मृत्यु; कात्रज -कोंढवा रोडवरील पुलावर झाला अपघात, रिक्षामालकावर गुन्हा दाखल

पुणे : Pune Accident News | १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलाने रिक्षा चालविण्यास घेऊन वेगाने जाताना पुलाच्या कठड्याला धडकविली. त्यात रिक्षातील १९ वर्षाच्या युवकाचा मृत्यु झाला. लायसन्स नसतानाही अल्पवयीन मुलाला रिक्षा चालविण्यास देणार्या रिक्षामालकावर भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
जालिंदर बबन साळुंके (वय ३५, रा. जैन मंदिर, कात्रज) असे गुन्हा दाखल झालेल्या रिक्षामालकाचे नाव आहे. रितेश शिवाजी गायकवाड (वय १९, रा़ गोकुळनगर, कात्रज कोंढवा रोड) असे अपघातात मृत्यु पावलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत पोलीस अंमलदार विठ्ठल एकनाथ चिपाडे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा अपघात कात्रज येथील कात्रज कोंढवा रोडवरील पुलावर १५ एप्रिल रोजी पहाटे अडीच वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज कोंढवा रोडवरील पुलावर पहाटे पावणे तीन वाजता रिक्षा धडकावल्याचा पोलीस नियंत्रण कक्षाला कळविण्यात आले. पोलीस व्हॅन तेथे पोहचल्यावर रितेश गायकवाड हा तेथे जखमी अवस्थेत पडला होता. पोलिसांनी त्याच्या आईवडिलांना कळविले व त्यांना आणण्यासाठी रिक्षा पाठविली. तोपर्यंत १०८ रुग्णवाहिका तेथे आली. तिच्यातून रितेश याला ससून रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचार सुरु असताना रितेश बेशुद्ध झाला. उपचार सुरु असताना १६ एप्रिल रोजी दुपारी पावणे दोन वाजता रितेश गायकवाड याचा मृत्यु झाला.
याबाबत पोलिसांनी माहिती घेतली असता रितेश गायकवाड, त्याचा मित्र पी के आणि त्याचे वडिल संतोष गेनबा आबनावे हे कात्रज चौकातील आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम संपल्यानंतर १५ एप्रिल रोजी मध्यरात्री दीड वाजता घरी जात होते. रिक्षाचालक जालिंदर साळुंके याने त्याच्या रिक्षातून गोकुळनगर येथील घरी सोडले. रात्री उशीर झाला असल्याने रिक्षा संतोष आबनावे यांच्या घरासमोर लावून ते त्यांच्या घरी झोपले. त्यांच्या अल्पवयीन मुलाने जालिंदर साळुंके यांना विचारुन त्यांची रिक्षा घेतली.
कात्रज चौकात त्याने रितेश व त्याचा मित्र गणेश यांना रिक्षामध्ये घेतले. रिक्षामध्ये बसताना त्यांनी दारुची बाटली कोठुनतरी आणलेली त्यांच्याजवळ होती. रिक्षामध्ये दारू पिले. गणेश व रितेश हे मागे बसले होते. या अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने, निष्काळजीपणे, वेडी वाकडी रिक्षा चालवून कात्रज – कोंढवा पुलावरील रेलींगला धडक दिली. त्यात मागे बसलेला रितेश गायकवाड याच्या डाव्या पायाच्या मांडीला गंभीर दुखापत झाली. रिक्षाचालक मुलगा घाबरुन तेथे न थांबता निघून गेला होता. हा अपघात पाहणार्या नागरिकाने पोलिस चौकीला येऊन अपघाताची माहिती दिली. पोलीस चौकीतील पोलीस अंमलदार यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला कळवले होते.
अल्पवयीन मुलाला रिक्षा चालविण्यास दिल्याबद्दल पोलिसांनी रिक्षाचालकावर गुन्हा दाखल केला आहे.