Sharad Pawar On Dhananjay Munde | ‘राज्य सरकारला बघ्याची भूमिका घेता येणार नाही, सत्तेच्या गैरवापरामुळे बीडमधील परिस्थिती खराब’; शरद पवारांचा धनंजय मुंडेंवर निशाणा

बारामती : Sharad Pawar On Dhananjay Munde | बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने मागील काही महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात घडामोडी वाढल्या आहेत. या हत्या प्रकरणात निकटवर्तीयांचा सहभाग आढळल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. मात्र राजीनामा देण्यास एवढा कालावधी का लागला? याबाबत जेष्ठ नेते शरद पवार यांनी आज बारामती येथील पत्रकार परिषदेत भाष्य केले आहे.

या विषयाच्या अनुषंगाने पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले, ” बीड जिल्ह्याला मी गेल्या अनेक वर्षांपासून ओळखतो. बीडमध्ये आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे तशी यापूर्वी कधीच नव्हती. सर्व घटकांना सोबत घेऊन जाणारा हा जिल्हा होता. मी स्वतः त्या भागात जेव्हा लक्ष देत होतो, मी उभे केलेले सहा-सहा सदस्य तिथं आमदार म्हणून निवडून आलेले आहेत.

जिल्ह्यात एकप्रकारचे सामंजस्याचे वातावरण होते. पण आता काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करण्याची भूमिका घेतली असून त्याचे परिणाम जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून दिसत आहेत. जो कायदा हातात घेतो, तो कोण आहे याचा विचार न करता त्यांच्याविरोधात राज्य सरकारने सक्त भूमिका घेण्याचे धोरण आखण्याची गरज आहे”, अशी स्पष्ट भूमिका शरद पवार यांनी घेतली आहे.

धार्मिक तणावाच्या मुद्द्यावर बोलताना शरद पवार पुढे म्हणाले, ” राज्यातील सरसकट वातावरण असं आहे, हे काय मी मान्य करणार नाही. पण काही ठिकाणी परिस्थिती बिघडली तर त्याच्या गैरफायदा घेणारे काही घटक आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याचा निकाल राज्य सरकारने घ्यावा. कठोर भूमिका घ्यावी. जात आणि धर्म यातील अंतर कोणी वाढवण्याचा प्रयत्न करत असेल तर राज्य सरकारला बघ्याची भूमिका घेता येणार नाही”, असे शरद पवार यांनी म्हंटले आहे.