Dhananjay Munde | धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचे कारण नैतिकता की वैद्यकीय, राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंनी पत्रक काढून विषयच संपवला

मुंबई : Dhananjay Munde | बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड घडवणारे आरोपी हे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्याने, तसेच या हत्याकांडाचे थरारक असे क्रौर्य दर्शवणारी छायाचित्रे काल प्रसारित झाल्यानंतर मुंडे यांना अखेर राजीनामा द्यावा लागला आहे. मात्र, धनंजय मुंडे यांनी एक्सवर एक पोस्ट करत वैद्यकीय कारणामुळे राजीनामा दिल्याचे म्हटल्यानंतर वादाचा मुद्दा उपस्थित झाला होता. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या संदर्भात एक पत्रक काढून विषयच संपवून टाकला आहे.
सुनील तटकरे यांनी पक्षाच्यावतीने जाहीर केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रारंभापासूनच अशी स्पष्ट भूमिका राहिली आहे की, संतोष देशमुख हत्याप्रकरणातील दोषींवर कडक कारवाई झालीच पाहिजे. बीडसह संपूर्ण राज्यभरातील आमच्या पक्षाच्या नेत्यांनी याबाबत अत्यंत ठाम भूमिका घेतली आहे.
आज धनंजय मुंडे यांनी घेतलेला राजीनाम्याच्या निर्णय हा नैतिकतेला धरून आहे. संतोष देशमुख प्रकरणाचा तपास कोणत्याही दबावाशिवाय सुरू आहे आणि तो असाच चालू राहून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही आमची अपेक्षा आहे. हे प्रकरण न्यायालयीन असून तपास सुरू असल्याने त्यावर अधिक भाष्य करणे उचित ठरणार नाही.
परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक गोष्ट अत्यंत स्पष्टपणे सांगू इच्छितो की कोणत्याही गुन्ह्याला, गैरकृत्याला पक्षाचे किंवा आमच्या नेत्यांचे कधीही समर्थन असणार नाही. आजच्या घटनेतून हाच संदेश राज्याला गेला आहे.
या पत्रकात पुढे म्हटले आहे की, धनंजय मुंडे यांचा या प्रकरणाशी संबंध आहे, असे तपासात समोर आलेले नाही. मात्र, नैतिकतेच्या मुद्यावर एक जबाबदार राजकीय नेता म्हणून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पूर्वीच नैतिक मुद्यांवर स्वतः राजीनामा देण्याचे उदाहरण निर्माण केले होते आणि या प्रकरणातही त्यांनी तशीच ठाम भूमिका घेतली होती.
या प्रकरणातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक महत्त्वाचा संदेश देत आहे, न्याय व्यवस्था आणि कायदा यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि त्यांच्या कामात आम्ही कधीही हस्तक्षेप करणार नाही. न्यायाला विलंब होऊ नये यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे या पत्रकात शेवटी म्हटले आहे.