Sanjay Raut On Sharad Pawar | नीलम गोर्हेंच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर शरद पवारांचं मौन संजय राऊतांनी हेरलं, म्हणाले – ”तेही तितकेच जबाबदार, ते कसे गप्प राहू शकतात?”

मुंबई : Sanjay Raut On Sharad Pawar | दिल्लीत एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) शरद पवारांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. या सोहळ्यात पवारांनी शिंदेंच्या राजकारणाला आदर्श राजकारण म्हणत कौतुक केले. यानंतर ठाकरेंची शिवसेना संतापली आहे. त्यातच काल-परवा दिल्लीतील साहित्य संमेलनात नीलम गोर्हे (Neelam Gorhe) यांनी ठाकरे कुटुंबिय आणि त्यांच्या शिवसेनेवर गंभीर आरोप केले. यानंतर पुन्हा एकदा ठाकरे सेनेचा संताप उफाळला आहे. यासर्व प्रकारात मौन धारण केलेल्या शरद पवारांवर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
दिल्लीत सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात नीलम गोर्हे यांनी एका मुलाखतीत ठाकरे कुटुंबियांवर गंभीर आरोप केला. ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडिज गाड्या दिल्या की एक पद मिळते ही वस्तुस्थिती आहे, असे वक्तव्य त्यांनी केले. यानंतर राज्यातील राजकारणात मोठा गदारोळ सुरू झाला आहे. इतका गदारोळ सुरू असताना महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेते शरद पवार मात्र मौन धरून आहेत. यावरूनच राऊत यांनी ही टीका केली आहे.
शरद पवार यांच्यावर निशाणा साधताना संजय राऊत म्हणाले, राजकीय चिखलफेक झालीय, त्याची जबाबदारी शरद पवारही झिडकारू शकत नाहीत. ते पालक होते, ते स्वागताध्यक्ष होते. ज्याप्रकारचे कार्यक्रम ठरवण्यात आले, राजकीय चिखलफेक झाली, तेही तितकेच जबाबदार आहेत. पवारांनी निषेध व्यक्त केला पाहिजे. ते कसे गप्प राहू शकतात? त्यांच्यावर चिखलफेक होते तेव्हा आम्ही उभे राहतो.
संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांवर चिखलफेक करण्याकरता दिल्लीत साहित्य संमेलन भरवले आहे का? मराठी साहित्य महामंडळ आहे, जे खंडण्या घेऊन संमेलन भरवतात. महामंडळ कार्यक्रम ठरवते आणि आयोजक सतरंज्या उचलायला असतात. महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी कार्यक्रम ठरवले. त्यांचे पती सार्वजनिक विभागाचे अधिकारी आहेत. हे सर्वांत भ्रष्ट खाते आहे.
संजय राऊत म्हणाले, नीलम गोर्हेंचे कालचे वक्तव्य म्हणजे त्यांची विकृती आहे. मला आठवतेय, बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की ही कोणती बाई आणली तुम्ही पक्षामध्ये? हे कोणते ध्यान आणले पक्षात? तरीही काही लोकांच्या मर्जीखातर त्या आल्या आणि चार वेळा आमदार झाल्या. आणि जाताना ताटात घाण करून गेल्या. या बाईचे विधान परिषदेचे कर्तृत्व समजून घ्यायचे असेल तर पुण्याचे गटनेते होते अशोक हरनाळ म्हणून त्यांची मुलाखत घ्या. मग हे मर्सिडिज प्रकरण कळेल.
संजय राऊत पुढे म्हणाले, विनायक पांडे यांना उमेदवारी देण्याकरता त्यांनी किती पैसे घेतले होते, हेही त्यांना जाऊन विचारा. त्यांनी नंतर या बाईकडून पैसे वसूल केले होते. माझे एवढेच म्हणणे आहे की तुम्ही कोणावर थुंकताय? मातोश्रीवर? असा सवाल राऊतांनी केला.
संजय राऊत म्हणाले, तुम्हाला बाळासाहेबांनी आमदार केले नाही. अशा घाणेरड्या लोकांना बाळासाहेब आमदार करत नाहीत. आम्ही दूर झालो, पण तुम्ही अशा प्रकारे विधाने करता. ज्यांनी तुम्हाला आमदार केले, म्हणून तुमचा रुबाब आहे ना.
मराठी साहित्य महामंडळाने माफी मागितली पाहिजे. विश्वासघातकी बाई, असे म्हणत संताप संजय राऊतांनी व्यक्त केला. नीलम गोर्हे बाई नाही. तो बाईमाणूस आहे. नीलम गोर्हे माफी मागण्याच्या लायकीच्या नाहीत, असेही राऊत म्हणाले.