Murlidhar Mohol On Pune Police | केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे पोलिसांना सुनावले खडे बोल (Videos)

पुणे : Murlidhar Mohol On Pune Police | आय टी इंजिनिअर तरुणाला विनाकारण मारहाण करुन दहशत निर्माण करणारे असो नाही तर पोलिसांना मारहाण करणाऱ्यांना सोडू नका, एवढेच काय तर त्यांना वाचविण्यासाठी येणार्‍यांविरोधात देखील कडक कारवाई करावी. सोशल मीडियावर अनेकांचे रिल्स, फोटो व्हायरल होत असताना पुणे पोलीस डोळे झाकून बसलेत का? याबाबत पोलिसांनी आत्मपरिक्षण करावे, असे खडे बोल केंद्रीय सहकार आणि नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सुनावले आहेत.

काही दिवसांपूर्वी तरंग २०२५ या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे पोलिसांचे तोंड भरुन कौतुक केले होते. या कौतुकाची शाई वाळत नाही. तोच पुणे पोलिसांना आत्मपरिक्षण करण्याचा सल्ला देण्याची वेळ मोहोळ यांच्यावर आली आहे. चतु:श्रृंगी आणि कोथरुडमधील दोन घटनांवरुन मोहोळ यांनी पुणे पोलिसांना कडक इशारा दिला. त्याचवेळी त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही पुण्यातील घटनांबाबत चर्चा करण्याची वेळ या घटनांमुळे आली.

पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी अवैध धंद्यांबाबत अतिशय कडक धोरण स्वीकारले आहे. अवैध धंद्यांना सरंक्षण देणार्‍यांची कोणतीही गय करणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. असे सरंक्षण देत असल्याची शंका जरी आली तरी त्यांना नियंत्रण कक्षात आणून बसविले आहे. अवैध धंदे चालू असले की त्यातून गुन्हेगारी वाढते. त्यातून मिळणार्‍या पैशांमधून गुंड, दादा मंडळी मस्तवाल बनतात. त्यांच्याकडून मिळणार्‍या हप्त्यांमुळे पोलीस व प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी डोळ्यावर पट्टी बांधून घेतात. त्याचा परिणाम या अधिकार्‍यांना सर्वसामान्य लोकांचा आवाज ऐकायला जात नाही. अन्यायही दिसून येत नाही. त्यामुळे अवैध धंद्यांविरोधात पोलीस आयुक्तांची ही भूमिका सर्वांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे. पण, काही जणांना ती पसंत पडत नाही, असे त्यांच्याकडून गुंडांना मिळत असलेल्या संरक्षणावरुन दिसून येते.

चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सेनापती बापट रोडजवळ एका पोलिसाला बेदम मारहाण होते. पण चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दबावापोटी या पोलिसालाच तक्रार देऊ नये, यासाठी गळ घालू लागले. शेवटी पोलीस आयुक्तांनी आदेश दिल्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा मध्यरात्रीनंतर दाखल केला. अशा प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकारीच नाखुशीने गुन्हा दाखल करत असतील, तर त्याचा तपास कसा होणार? तपास झाला तरी आरोपींना न्यायालयात शिक्षा होईल, असा भक्कम पुरावा गोळा केला जाणार का? असे अनेक प्रश्न सामान्य पुणेकरांच्या मनात उपस्थित झाल्याशिवाय राहत नाहीत.

कोथरुडमधील घटना तर त्याहून अधिक गंभीर आहे. केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या जवळच्या कार्यकर्त्याला भर चौकात मारहाण झाल्याची घटना घडते. पोलीस गुन्हाही दाखल करतात. परंतु, मारहाण करणारे गुंड हे गजा मारणे टोळीतील आहे, हे समजल्यावर पोलिसांचा सूर बदलतो. प्रकरण कसे लोकांपर्यंत जाणार नाही, याची कोथरुड पोलीस पुरेपुर काळजी घेताना दिसत होते. मारहाण झाल्याचे सीसीटीव्ही फुुटेज पोलिसांना मिळाल्यावर ते आरोपी हे गजा मारणे टोळीतील गुंड असून त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. हे सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर लगेच लक्षात आले असले पाहिजे. तरीही पोलिसांकडून या गुंडांना ताब्यात घेतल्यानंतरही २४ तासांहून अधिक काळ ही मारहाण गजा मारणे टोळीतील गुंडांनी केली आहे तसेच या गुंडांची नावे मीडियापर्यंत जाऊ नये, यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने पुरेपुर प्रयत्न केले. किरकोळ मारहाणीचा गुन्हा दाखल करुन प्रकरण रफादफा करण्याचा पोलिसांचा प्रयत्न होता. मीडियालाही या गुंडांची नावे समजू नये, यासाठी टाळाटाळ केली गेली. त्यामुळेच मग वरिष्ठ पातळीवर चक्रे फिरली आणि किरकोळ मारहाणीचा हा गुन्हा खुनाचा प्रयत्न केल्याचा झाला.

आदल्या रात्री हाच गुन्हा किरकोळ मारहाणीचा असताना रात्रीतून तो खुनाचा प्रयत्न केल्याचा कसा झाला. अगोदरच योग्य काळजी घेतली असती तर? राजकीय क्षेत्राला हस्तक्षेप करायची संधी कोणी दिली, याचा अतिवरिष्ठ पोलीस अधिकारी विचार करणार आहेत का?. भाजप कार्यकर्ता म्हणून नव्हे तर पुण्यातील प्रत्येक तरुण किंवा नागरिकांबाबत पोलिसांची कडक भूमिका घेतली पाहिजे. पुणे शहराचे नाव अशा पद्धतीने खराब होत असेल तर ते चालून देणार नाही. शहरातील हे सगळे थांबले पाहिजे, अन्यथा आमच्या पद्धतीने आम्ही काम करु, असा इशाराही राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिला.

मुरलीधर मोहोळ यांना अशा प्रकारे इशारा देण्याची वेळ कोणामुळे आली. शहरातील पोलीस चौक्या, पोलीस ठाण्यात अनेक प्रकरणे घडत असतात. त्यावर तेथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे न्याय भूमिका घेतील, तशी ती त्यांनी घ्यावी, अशी वरिष्ठांची अपेक्षा असते. सर्वच प्रकरणे वरिष्ठांपर्यंत पोहचतात असे नाही. बहुतांशी लोकांना वरिष्ठांपर्यंत पोहचण्याचा मार्ग ही माहित नसतो. काहीच गोष्टी वरिष्ठांपर्यंत पोहचतात. त्यातून स्थानिक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी न्याय भूमिका न घेतल्यानेच ते वरिष्ठांपर्यंत गेल्याचे दिसून येते.

पाच वर्षांपूर्वी सोशल मीडियावर दहशत निर्माण करण्यासाठी फोटो टाकणारे, रिल्स बनविणारे, चौकात तलवारीने वाढदिवसाचा केक कापणारे यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक पथक तैनात होते. गुन्हे शाखेच्या अंतर्गत असलेल्या या पथकाने सोशल मीडियावर अशा गोष्टी टाकणार्‍यांचा शोध घेऊन त्यांना गजाआड टाकण्याची मोहिमच हाती घेतली होती. त्यातून पुणे शहरात तलवारीने केक कापण्याचे प्रकार बंद झाले होते. तसेच व्हॉटसअप स्टेटसवर हातात पिस्तुल, तलवार असलेले फोटो टाकणार्‍यांवरही कारवाई करण्यात आली होती. नंतर वरिष्ठ अधिकारी बदलले, तसे सोशल मीडियाकडे लक्ष देण्याकडे दुर्लक्ष झाले. त्याचा परिणाम पुन्हा असे दहशत निर्माण करणारे स्टेटस ठेवणार, रिल्स बनविणार्‍यांची संख्या वाढली. त्यांच्यावर कारवाया होत नसल्याने राजकीय नेत्यांना पोलिसांना आत्मपरिक्षण करण्याचा सल्ला देण्याची संधी मिळाली. काही अधिकार्‍यांमुळे सर्व पुणे पोलीस बदनाम होऊ लागले आहे, त्याचा विचार झाला पाहिजे.