Devendra Fadnavis | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या एक आदेश आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदार-नेत्यांच्या सुरक्षेत कपात, तानाजी सावंतांना आता अवघा 1 सुरक्षारक्षक

मुंबई : Devendra Fadnavis | मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री पदाचे वाटप, खातेवाटप, पालकमंत्रीपदांचे वाटप यामध्ये योग्य तो वाटा न मिळाल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचे बोलले जात आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याकडे दुर्लक्ष करत धडाकेबाज निर्णय घेत सुटले आहेत, यामुळे शिंदे यांना धक्के बसत आहेत. आता तर देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे आमदार-नेते यांची सुरक्षा अचानक कमी केली आहे. एकनाथ शिंदेंनी केलेल्या शिफारशीनंतर तब्बल 48 पोलीसांचा लवाजमा सोबत घेऊन फिरणार्‍या आमदार तानाजी सावंत यांच्याकडे आता अवघा एक सुरक्षारक्षक राहिला आहे.

राष्ट्रवादी आणि भाजपच्या तुलनेत शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये ही कपात अतिशय मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात तानाजी सावंत हे आरोग्यमंत्री होते. मंत्रिपदाचा दर्जा असल्याने त्यांना वाय दर्जाची सुरक्षा होती. ज्यामध्ये चार कर्मचारी आणि एका वाहनाचा समावेश असतो.

मात्र, तानाजी सावंतांनी त्यांच्या सुरक्षेसाठी पुणे पोलीस दलातील तब्ब्ल 48 पोलीस कर्मचारी आणि तीन वाहने नियुक्त करुन घेतली होती. तानाजी सावंत त्यांचा उपयोग त्यांच्या कार्यालयासमोर बंदोबस्त तैनात करण्यासाठी, त्यांच्या घरासमोर बंदोबस्त तैनात करण्यासाठी आणि ते जिथे जातील तिथे त्यांच्यासोबत कर्मचार्‍यांचा ताफा नेण्यासाठी करत होते.

मध्यंतरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी तानाजी सावंत यांच्या सुरक्षेसाठी असलेले पोलीस कर्मचारी कमी करण्याचा प्रयत्न केला होता. ही संख्या 15 वर आणली होती. मात्र, तानाजी सावंतांनी एकनाथ शिंदेंमार्फत पोलीस आयुक्तांवर दबाव आणून पुन्हा पाहिल्याएवढे पोलीस कर्मचारी स्वतःच्या सुरक्षेसाठी नियुक्त करुन घेतले होते. मात्र, आता तानाजी सावंत मंत्री नसल्याने त्यांची सुरक्षाव्यवस्था काढून घेतली आहे. सावंत यांना आता आमदार म्हणून केवळ एक सुरक्षारक्षक पुरवण्यात आला आहे.

राज्यात पोलीस दलाचे बळ सध्या कमी आहे. असे असतानाही अनेक मंत्री आणि राजकारणी बडेजाव म्हणून मोठ्या प्रमाणात त्यांच्या बंदोबस्तासाठी पोलीस कर्मचारी नियुक्त करुन घेतात. याचा ताण पोलीस दलावर येतो.

दरम्यान, शिवसेनेच्या आमदार आणि नेत्यांना वाय दर्जाची सुरक्षा होती. मात्र आता त्यात कपात केल्याने शिवसेना नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. ज्या नेत्यांच्या जीवाला कोणताही धोका नाही अशा शिवसेनेच्या नेत्यांची सुरक्षा कमी केली असल्याचे समजते.