Pune News | पुण्यात महाराष्ट्र राज्य कृषी खते उत्पादक न्याय हक्क समितीची स्थापना

पुणे : Pune News | जे कृषी खते उत्पादक व्यावसायिक विनापरवाना, विना जीएसटी काम करतात त्यांना आळा घालून त्यांना नियमात काम करावयास लावण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य कृषी खते उत्पादक न्याय हक्क समितीची स्थापना शुक्रवार (दि.७) पुणे येथे करण्यात आली आहे. या समिती कार्यकारिणीच्या निवडीमध्ये अध्यक्ष समित पवार, उपाध्यक्ष मेघराज निकम, सरचिटणीस रवी नरसाळे, चिटणीस जयदीप पाटील, खजिनदार अमोल राठोड, संपर्क प्रमुख राजेश मुकणे, सह संपर्कप्रमुख शिवकुमार शिंदे, प्रवक्ता सुहास थोरवत, सहप्रवक्ता स्वप्नील सूर्यवंशी, व्यवस्थापक इरफान शेख यांचा समावेश आहे. परवानाधारक खते व्यवसायिकांना होणारा शासकीय व अशासकीय त्रास कमी करणे या भूमिकेतून समितीची स्थापना करण्यात आली आहे.
समितीची उद्दिष्टे-
गुजरात मधून येत असलेले अवैद्य निकृष्ट दर्जाचे कृषी उत्पादन यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे आणि उत्पादन खर्च विनाकारण वाढत आहे, अशा निकृष्ट कृषी खत उत्पादनास आळा घालणे.
महाराष्ट्रात निकृष्ट दर्जाचे कृषी खते उत्पादने बनविणारे व्यवसायिक व निकृष्ट दर्जाचे उत्पादन विकणारे दुकानदार यांची माहिती शासनास कळवून यांच्यावर जागेवर कारवाई करण्यास शासनास मदत करणे.
समितीमध्ये सदस्य असणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व खत उत्पादक कंपन्यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीतज्ञांच्या माध्यमातून मार्गदर्शन करणे.
या न्याय हक्क समिती मार्फत परवानाधारक खते व्यवसायिकांच्या हक्कांच्या मागण्या, त्यांच्या अडचणी संदर्भात निवेदने कृषी आयुक्त व कृषी मंत्रालय महाराष्ट्र शासनास सादर करणे.