Dhananjay Munde | मंत्री धनंजय मुंडेंचे मोठे विधान; म्हणाले – ‘मुख्यमंत्र्यांनी राजीनामा मागितला तर मी राजीनामा देईल’

Dhananjay-Munde-1

दिल्ली : Dhananjay Munde | सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडला अटक झाली आहे. कराडमुळे धनंजय मुंडे अडचणीत सापडले आहेत. दरम्यान याप्रकरणी विरोधी पक्षांकडून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. त्याच दरम्यान धनंजय मुंडे हे दिल्ली दोऱ्यावर गेले आहेत. त्यामुळे ते राजीनामा देणार, असा अंदाज वर्तवण्यात येत होता.

आज दिल्लीला धनंजय मुंडे यांनी केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जर मुख्यमंत्र्यांना मी दोषी वाटत असेल तर मी राजीनामा देण्यास तयार आहे. परंतु नैतिकतेतून मी दोषी वाटत नसल्याचेही धनंजय मुंडे यांनी म्हंटले आहे.

धनंजय मुंडे म्हणाले, नैतिकतेतून मी दोषी वाटत नाही, पण जर मुख्यमंत्र्यांना मी दोषी वाटत असेल तर त्यांनी राजीनामा मागावा. मुख्यमंत्र्यांनी तशी मागणी केली तर मी राजीनामा देण्यास तयार आहे, असे विधान दिल्ली दौऱ्यावर असलेल्या धनंजय मुंडे यांनी केले आहे.

ते पुढे म्हणाले, ” प्रल्हाद जोशी हे केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री आहेत. मी राज्यातील महायुती सरकारचा अन्न व पुरवठा मंत्री आहे. त्यामुळे मी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आलो होतो. तसेच राज्यातील नागरिकांना रेशन मिळण्याबाबत काही समस्या होत्या त्यांची माहिती मी त्यांना दिली.

राज्यातील लोकसंख्या वाढली आहे. आता फक्त ७ कोटी लोकांना अंत्योदय अन्न योजनेचा लाभ मिळतोय. जनसंख्या वाढली तर जास्त लोकांना लाभ मिळाला पाहिजे होता. तसेच जे लाभार्थी आहेत त्यांना त्यांची सर्व माहिती द्यावी लागते. त्यात ऑनलाईनची जी समस्या आहेत, त्याची माहितीही आपण केंद्रीय मंत्र्यांना दिली आहे.