Siddhesh Kadam On Pollution In Pune | सोसायट्यांमधील मैलापाणी प्रक्रिया केंद्र कार्यरत ठेवणे हे सोसायटीतील नागरिकांचे कर्तव्यच, स्मशानभूमीत जळाउ लाकडाला पर्याय देणार – राज्य प्रदूषण नियामक मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम

पुणे : Siddhesh Kadam On Pollution In Pune | प्रदूषण कमी करण्यासाठी सोसायट्यांमधील मैलापाणी प्रक्रिया केंद्र कार्यरत ठेवणे ही तेथील नागरिकांचे कर्तव्य आहे. त्यांनी ते पार पाडलेच पाहीजे. सिंगल यूज्ड प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी माध्यमांनी अधिकाअधिक जनजागृती करण्यासाठी पुढे यायला हवे, असे मत राज्य प्रदूषण नियामक मंडळाचे Maharashtra Pollution Control Board (MPCB) अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
सिद्धेश कदम यांनी आज पुणे महापालिकेमध्ये शहरात राबविण्या येणार्या प्रकल्पांचा पर्यावरण आणि प्रदूषणाच्या दृष्टीकोनातून आढावा घेतला. यामध्ये प्रामुख्याने मैलापाणी प्रक्रिया प्रकल्प, कचर्यावरील प्रक्रिया प्रकल्प आणि स्मशानभूमींची सद्यस्थिती आणि भविष्याच्या दृष्टीने महापालिकेकडून राबविण्यात येणार्या प्रकल्पांवर चर्चा झाली. तसेच हे प्रकल्प राबविताना येणार्या अडचणींबाबत राज्य शासनाकडे आपणी स्वत: पाठपुरावा करू, असे आश्वासन कदम यांनी या बैठकीत दिले. याप्रसंगी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी.पी., ड्रेनेज विभागाचे उपायुक्त जगदीश खानोरे, घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम, विद्युत विभागाच्या शहर अभियंता मनीषा शेकटकर आणि पर्यावरण विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
सिद्धेश कदम यांनी सांगितले, की महापालिकेच्यावतीने मैलापाण्यावर प्रक्रिया करणार्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत. यानंतरही जे मैलापाणी थेट नदीमध्ये जाते, ते नदीत सोडण्यापुर्वी ओढे, नाल्यांच्या भागातच त्यावर प्रक्रिया करण्यासंदर्भात एमपीसीबी कडून उपाययोजना सुचविण्यास मदत करण्यात येईल. एसटीपी प्लांट तसेच कचरा प्रक्रिया प्रकल्पांसाठीच्या जागा मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल. शहराला पाणी पुरवठा करणार्या धरण क्षेत्रांच्या परिसरात मोठ्याप्रमाणावर हॉटेल्स, फार्म हाउस तसेच व्यावसायीक आस्थापना तयार झाल्या आहेत. तेथे निर्माण होणारे मैलापाणी धरणांच्या पाण्यात मिसळते का याची तपासणी करण्यासाठी सर्वेक्षण करण्याच्या पीएमआरडीएला सूचना करण्यात येतील.
शहरात मोठ्या प्रमाणावर विकास कामे सुरू असल्याने धुळीचे प्रमाण भरपूर आहे. यामध्ये आरएमसी प्लँटमुळे देखिल भर पडते. ती टाळण्यासाठी एमएमआरडीएच्या धर्तीवर काही उपाययोजना महापालिकेला सुचविण्यात येत आहेत. समाविष्ट गावांमध्ये प्रदूषण रोखण्यासाठी काय उपाययोजना सुरू आहेत, भविष्यात काय प्लॅनिंग आहे याचा अहवाल देण्याचे महापालिकेला सांगितले आहे, असे कदम यांनी नमूद केले.
अंत्यसंस्कारासाठी जळाउ लाकडाला पर्याय देउ
स्मशानभूमीमध्ये दहनाचा विषय संवेदनशील आणि किचकट आहे. सर्व बाजूंनी योग्य बॅलन्स राखून जळावू लाकडाला पर्याय देण्याचा आमचा विचार आहे. येत्या काळात विद्युत, गॅस दाहिनी सारख्या पर्यांयांना प्राथमिकता देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील, असे सिद्धेश कदम यांनी यावेळी नमूद केले.
सिंगल युज्ड प्लास्टिकचा वापर करण्यासाठी जनजागृती गरजेची आहे. अधिकाअधिक जनजागृतीसाठी माध्यमांनी पुढे यायला हवे असे आवाहन करतानाच सिद्धेश कदम यांनी सिंगल युज्ड प्लास्टिक वापराबाबत आकारण्यात येणार्या दंडाची रक्कम खूपच आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने त्यांच्या अधिकारात महापालिका अधिनियमानुसार दंडाची रक्कम कमी करता येईल का हे तपासून पहावे, असेही कदम यांनी नमूद केले.