Dhananjay Munde | धनंजय मुंडेंचे खळबळजनक विधान; म्हणाले – ‘अजितदादांना पाया पडून सांगत होतो भाजपसोबत जाऊ नका, हे षडयंत्र आहे, सुनील तटकरे साक्षीदार आहेत’

अहिल्यानगर : Dhananjay Munde | शिर्डीमध्ये सुरु असलेल्या राष्ट्रवादीच्या नवसंकल्प शिबिराला धनंजय मुंडेंनी उपस्थिती लावली. यावेळी पहाटेच्या शपथविधीवरून खळबळजनक विधान केले आहे.त्याचबरोबर बीडमध्ये गेल्या महिन्याभरात घडत असलेल्या घडामोडींवरही भाष्यकेले आहे.
“२०१९ मध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाला होता. या शपथविधी वेळी मी अजितदादांना सांगितलेलं की तुम्ही भाजपसोबत नका जाऊ, हे षडयंत्र आहे. पायाही पडलो. तेव्हा दादा म्हणाले की, काही नाही होणार. सुनील तटकरे साक्षीदार आहेत. तेव्हापासून अजितदादांना पक्षातून दूर करण्याचं षडयंत्र सुरू झालं”, असे विधान धनंजय मुंडे यांनी केले आहे.
धनंजय मुंडे म्हणाले, सरपंच देशमुख यांच्या निर्घृण हत्येचं कोणीही समर्थन करू शकत नाही. हत्या करणाऱ्यांना फासावर लटकवायला पाहिजे. ५- ८ गुन्हेगारांमुळे मीडिया ट्रायल होतेय. बीडचा बिहार झालाय म्हणतायत, पण कुणी केला? १२ ज्योतिर्लिंगापैकी एक परळी आहे. पण एका गावाला आणि जिल्ह्याला बदनाम करण्यात येतंय.
मला टार्गेट करण्यासाठी काही लोक काम करत आहेत. बीड जिल्ह्याची जबाबदारी तुमच्यावर आली आहे. बीडच नव्हे तर पूर्ण मराठवाड्यात सामाजिक सलोखा बिघडला आहे. आम्ही शिव शाहू फुलेंच्या विचाराचे आहोत का? असा प्रश्न विचारला जातोय. पण एक सांगेन की आपला एकमेव पक्ष आहे जो शिव शाहू फुलेंच्या विचाराने चालतो.
माझ्या वैयक्तिक विषयात पक्ष माझ्यासोबत राहिला. माझ्या देहावरील अग्नीचा धूर देखील परतफेड करू शकणार नाही. गरज पडली तेव्हा आम्ही तुमच्यासाठी शत्रूंना शिंगावर घेतलं. टीका करायची झाली तर माझ्यासारखा टीकाकार होणार नाही. नवसंकल्प करायचा असेल तर कार्यकर्त्यांवर तेवढा विश्वास ठेवला पाहिजे”, असे धनंजय मुंडे यांनी म्हंटले आहे.