Sharad Pawar On Amit Shah | ‘त्यांना कदाचित माहीत नसेल 1978 ला मी राज्याचा मुख्यमंत्री होतो’, अमित शहांनी केलेल्या टीकेवर शरद पवारांचा पलटवार; म्हणाले, ” कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे….”

मुंबई : Sharad Pawar On Amit Shah | विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या घवघवीत यशानंतर भाजपचे शिर्डीत महाविजय अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात बोलताना केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी शरद पवारांसह उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली होती. ” महाराष्ट्राच्या विजयाचे अनेक अर्थ आहेत. महाराष्ट्राच्या विजयाने १९७८ पासून शरद पवारांनी जे दगा फटक्याचं जे राजकारण होतं ते २० फूट गाडण्याचं काम केलं. उद्धव ठाकरेंनी आपल्याशी जो द्रोह केला, २०१९ ला विचारधारा सोडली आणि बाळासाहेब ठाकरेंच्या सिद्धातांशी तडजोड केली. फसवणूक करुन, लबाडी करुन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते. उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राने त्यांची जागा दाखवली. १९७८ ते २०२४ पर्यंत महाराष्ट्रात अस्थिरतेचं राजकारण सुरु होतं. ते जनतेने संपवून दाखवलं.”,अशी टीका अमित शहा यांनी केली होती.

या टीकेवर आता शरद पवार यांनी शेलक्या शब्दात पलटवार केला आहे. ‘कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शामभट्टाची तट्टाणी’, असे म्हणत पवारांनी शहांचा समाचार घेतला आहे. शरद पवार म्हणाले, ” देशाच्या गृहमंत्र्यांनी शिर्डीत भाषण केलं. भाषण करणं हा त्यांचा अधिकार आहे. पण थोडीबहुत माहिती घेऊन भाषण केलं तर लोकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकते. १९७८ चा संदर्भ देऊन अमित शहा यांना माझी आठवण झाली. १९७८ पासून मी राजकारणात काय केलं त्याचा उल्लेख त्यांनी भाषणात केला. १९७८ मध्ये म्हणजे ४० वर्षांपूर्वी अमित शहा नक्की कुठे माहीत नाही.

त्यांना कदाचित माहीत नसेल १९७८ ला मी राज्याचा मुख्यमंत्री होतो. माझ्या मंत्रिमंडळात जनसंघाचे नेते उत्तमराव पाटील, दुसरे नेते हशू अडवाणी असे जनसंघाचे लोक होते. १९७८ च्या पुलोद सरकारची माहिती घेतली तर महाराष्ट्रासाठी चांगलं योगदान दिलं. मी मुख्यमंत्री असताना उत्तमराव पाटील उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते. हशू आडवाणी नगरविकास मंत्री होते. माझ्या मंत्रिमंडळात कर्तृत्ववान लोक माझ्या बरोबर काम करत होते”, असा खोचक टोला शरद पवार यांनी लगावला आहे.

ते पुढे म्हणाले, ” अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांची नावं घेता येतील. त्यांनी कधी अतिरेकी भूमिका घेऊन राजकारण केलं नाही. भूजला भूकंप झाला तेव्हा देशातल्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलवण्यात आली होती. त्यात भूकंप, अतिवृष्टी या संकटांमध्ये काय केलं पाहिजे त्यासाठी आपात्कालीन स्थितीत काय केलं पाहिजे यावर चर्चा झाली. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयींनी माझं नाव आपात्कालीन स्थितीत काय करता येईल याबाबत शरद पवारांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे असं सुचवलं होतं.

अटलबिहारी वाजपेयी यांनी मी विरोधी पक्षात असताना मंत्र्याचा दर्जा देऊन मला ते काम सोपवलं होतं. ही पार्श्वभूमी अलिकडच्या लोकांना माहीत नसावी. मी किंवा उद्धव ठाकरे यांच्याबाबत जे उल्लेख झाले त्याबाबत एक मराठीत म्हण आहे ‘कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शामभट्टाची तट्टाणी’, ही म्हण मला आठवते”, असे म्हणत शरद पवार यांनी अमित शहा यांची खिल्ली उडवली.