Sharad Pawar On Santosh Deshmukh Murder Case | संतोष देशमुख हत्या प्रकरणी शरद पवारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; म्हणाले – ‘गुंड प्रवृत्तीची पाळेमुळे खणून…’

Sharad Pawar

पुणे : Sharad Pawar On Santosh Deshmukh Murder Case | बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. आतापर्यंत या प्रकरणांमध्ये ८ जणांना अटक करण्यात आली असून, सदर प्रकरणी यंत्रणांनी तपासाला वेग देत कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. एक आरोपी अद्याप फरार असून अटकेत असलेल्या आरोपींची सीआयडी चौकशी सुरू आहे.

मात्र या प्रकरणात महिना लोटला तरीही पोलिसांकडून ठोस कारवाई झालेली नाही असा आरोप केला जातोय. याप्रकरणी बीडमध्ये भव्य मोर्चे निघाले असून आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान, या प्रकरणात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनीही भूमिका मांडली आहे. गुंडांपासून लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका निर्माण झाला असून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालावे, तसेच, लोकप्रतिनिधींच्या व इतरांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत त्यांना शासनामार्फत योग्य ते पोलीस संरक्षण पुरवावे, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

” संतोष देशमुख यांची माणुसकीला काळीमा फासणारी घटना केवळ एकच नसून यापूर्वी हत्या, अपहरण, खंडणी, खोटे गुन्हे दाखल होणे अशा अनेक घटना बीड-परळी भागात घडल्या असल्याने त्या घटनांची पाळेमुळे खणून काढावीत. अनेक घटनांचा परस्परसंबंध असल्याची शक्यता आहे. एकूणच अनेक प्रकरणांची मालिका तपासात समोर येण्याची शक्यता असल्याने लोकप्रतिनिधी तसेच सदर प्रकरणात भूमिका मांडणाऱ्यांना शासनामार्फत योग्य ते पोलीस संरक्षण पुरवावे, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे.

शरद पवारांनी आपल्या पत्रात म्हंटले आहे की , ” मागील महिन्यात बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे काही गुंडानी अपहरण करून निघृण हत्या केली. सदर अमानवीय घटनेचे पडसाद केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात उमटले. गुन्ह्यातील फरार आरोपींना आणि त्यामागील सुत्रधारांना तात्काळ अटक करावी म्हणून महाराष्ट्राभरात आंदोलने उभी राहिली आहेत.

यासंदर्भात बीड जिल्ह्यात निघालेला पहिला आक्रोश मोर्चा राज्य शासनापर्यंत या घटनेचे गांभीर्य पोहोचवणारा होता. त्यात जात, धर्म आणि पक्ष हे भेद बाजूला सारून क्रौर्याची परिसीमा गाठणाऱ्या घटनेचा निषेध झाला. फरार आरोपींना व त्यामागील सुत्रधारांना तात्काळ अटक होऊन कडक शासन व्हावे अशी एकमुखाने मागणी करण्यात आली. सदर आक्रोश मोर्चाच्या सांगता प्रसंगी आमदार संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके, जितेंद्र आव्हाड, अभिमन्यू पवार आणि सुरेश धस तसेच बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी आपल्या भाषणातून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.

घटनेत सहभागी असणारे गुंड, घटनेचे सुत्रधार व घटनेस जबाबदार असणाऱ्या व्यक्तीचा नामोल्लेख केला. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला लांछन लावणाऱ्या ह्या घटनेचा तातडीने तपास व्हावा याकरीता प्रसारमाध्यमे देखील महत्त्वाची भूमिका बजावीत आहेत”, असे शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे केलेल्या मागणीत म्हंटले आहे.