Supreme Court On Divorce Case | ‘कठोर कायदे महिलांच्या हितासाठी, पतीची पिळवणूक करण्यासाठी नाही’, सुप्रीम कोर्टाची महत्वपूर्ण टिप्पणी

Supreme-Court

दिल्ली : Supreme Court On Divorce Case | सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने एका जोडप्याच्या घटस्फोट प्रकरणाचा निर्णय देताना महत्वाचे निरीक्षण नोंदवले आहे. महिलांच्या हितासाठी तयार करण्यात आलेल्या कायद्यांचा वापर पतीला धमकावण्यासाठी, त्याचा छळ करण्यासाठी किंवा खंडणीचे साधन म्हणून होऊ नये, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हंटले आहे.

यावेळी सर्वोच्च न्यायालयाने असेही स्पष्ट केली की, पोटगी म्हणजे विभक्त पती आणि पत्नीला आर्थिकदृष्ट्या एकाच पातळीवर आणण्याचे साधन नाही. पोटगीची तरतूद अवलंबून असलेल्या महिलेला योग्य पद्धतीने जगता यावे यासाठी करण्यात आली आहे.

संबंधित प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना आणि न्यायमूर्ती पंकज मिठा यांच्या खंडपीठाने म्हटले की, महिलांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, त्यांच्यासाठी बनवण्यात आलेले कायदे त्यांच्या कल्याणासाठी आहेत. ते पतीला धमकावणे, त्याच्यावर वर्चस्व गाजवणे किंवा त्याची पिळवणूक करण्यासाठी नाहीत.

काही दिवसांपूर्वी बंगळुरूतील तंत्रज्ञ अतुल सुभाष यांनी पत्नीने मानसिक आणि आर्थिक छळ केल्याचा आरोप करत आत्महत्या केली होती. अतुल सुभाष यांच्या विभक्त पत्नीने त्यांच्याकडे सुरुवातीला मासिक २ लाख रुपये आणि नंतर वार्षिक ३ कोटी रुपयांच्या पोटगीची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाची निरीक्षणे महत्त्वाची मानली जात आहेत.

न्यायालयाने पुढे म्हंटले की, पती विभक्त पत्नीला त्याच्या सध्याच्या आर्थिक स्थितीच्या आधारे अनिश्चित काळासाठी आधार देण्यास बांधिल असू शकत नाही. हिंदू विवाह हा व्यावसायिक उपक्रम नसून, कुटुंबाचा पाया म्हणून याकडे पाहिले जाते. यावेळी न्यायालयाने महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पतीकडून मोठ्या आर्थिक मागण्या पूर्ण करण्यासाठी फौजदारी तक्रारींचा गैरवापर केल्याची अनेक उदाहणेही दिली.

यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने एका जोडप्याच्या घटस्फोट प्रकरणाचा निर्णय देताना, अंतिम तोडगा म्हणून पतीने विभक्त पत्नीला कायमस्वरूपी पोटगी म्हणून १२ कोटी रुपये देण्याचे आदेश दिले. या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान पत्नीने दावा केला होता की, पतीचे भारतासह अमेरिकेत अनेक व्यवसाय आहेत. त्याच्याकडे ५ हजार कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्याने पहिल्या पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर तिला ५०० कोटी रुपयांची पोटगी दिली होती.