Asha Raut News | आशा राऊत यांचा तेजस्विनी पुरस्काराने सन्मान; चिंतामणी ज्ञानपीठाच्या वतीने विशेष सन्मान

Asha Raut

पुणे : Asha Raut News | प्रशासकीय सेवेत प्रदीर्घकाळ प्रामाणिकपणाने दिलेल्या योगदानाबद्दल चिंतामणी ज्ञानपीठाच्या वतीने पुणे महापालिकेच्या उपायुक्त आशा भास्कर राऊत यांचा तेजस्विनी पुरस्कार देऊन आज विशेष सन्मान करण्यात आला. गणेश कला क्रीडा मंदिरात रंगलेल्या सोहळ्यामध्ये हजारो लोकांच्या उपस्थितीत त्यांच्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा करण्यात आला.

माजी आमदार अश्विनी जगताप यांच्या हस्ते शाल, मोत्याची माळ, ज्ञानेश्वरी, श्रीफळ आणि जिजाऊ-शिवबा यांचे शिल्प असलेले विशेष स्मृतीचिन्ह देऊन आशा राऊत यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी त्यांचे पती भास्कर राऊत देखील उपस्थित होते. या प्रसंगी व्यासपीठावर माजी आमदार मा. अश्विनीताई जगताप, ऐश्वर्या रेणुसे, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलासराव मेंडगिरी, उद्योजक नवीनशेठ लायगुडे, नगरसेवक राजेंद्र जगताप, वरिष्ठ पत्रकार व लेखक पराग पोतदार, विलासराव भणगे, सचिन डिंबळे, मुख्याध्यापिका शर्मिला पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी प्राईड न्यू इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलनही उत्साहात पार पडले. या वेळी विद्यार्थ्यानी मल्लखांब प्रात्यक्षिकासह विविध नृत्यांतून कलागुण सादर केले. उपस्थितांना संबोधित करताना अश्विनी जगताप म्हणाल्या, तेजस्विनी पुरस्काराने आज ज्यांना सन्मान केल्या त्या आशा राऊत यांचे काम खरोखरीच उल्लेखनीय आहे. अत्यंत प्रामाणिकपणे आणि जिद्दीने त्यांनी आजवरची वाटचाल केलेली आहे. आज स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने मुलांचा उत्साह पाहताना जाणवते की हा आनंदाचा महोत्सव आहे. मल्लखांबाची चित्तथरारक प्रात्यक्षिके पाहताना थक्क व्हायला होत होते. मुलांना माझे हेच सांगणे आहे, की खूप मोठे व्हा पण आपल्या आई वडिलांना आणि गुरुजनांना कधीही विसरू नका. आपल्या घडवणारे आणि आपल्यावर प्रेम करणारे तेच असतात. त्यांना मान द्यायला शिका आणि आपल्या देशाचे नाव मोठे करा.

सत्काराला उत्तर देताना आशा राऊत म्हणाल्या, १९९८ पासून मी प्राथमिक शिक्षिका म्हणून काम केले आहे. २००८ पासून मी प्रशासनात विविध जबाबदाऱ्यांवर काम करते आहे. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. तो पुरस्कार मला मिळाला याचा आनंद आहे. अशा पुरस्कारातून प्रेणा मिळते. अधिक जोमाने काम करण्याचे बळ मिळते आणि जबाबदारीचे भानही येते. त्याच भावनेतून मी या पुरस्काराचा स्वीकार करते आहे. स्नेहल साळुंखे यांनी आभार मानले.