Eknath Shinde News | गृहखात्यावरून नाराजी असतानाच शिवसेनेच्या 4 नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप; एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार? राजकीय वर्तुळात चर्चा

मुंबई : Eknath Shinde News | महायुतीला (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? यावरून महायुतीत रस्सीखेच सुरु असल्याचे चित्र होते. दिल्लीत झालेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळतील असे संकेत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून (BJP Leaders) देण्यात आले आहेत.

दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी माघार घेत मुख्यमंत्रि‍पदासाठी भाजपचा मार्ग मोकळा केला असला तरी ते नाराज असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या सोबत झालेल्या बैठकीत राज्याच्या गृहखात्यासह १२ मंत्रि‍पदांची मागणी केली आहे. मात्र आता शिंदे गटाच्या ४ मंत्र्यांच्या समावेशाला भाजपने आक्षेप घेतल्याची माहिती आहे.

शिंदेंच्या शिवसेनेतील अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, तानाजी सावंत, संजय राठोड या चार नेत्यांच्या नावाला भाजपचा आक्षेप आहे. या चारही मंत्र्यांनी केलेल्या कारभारावरून भाजपमध्ये नाराजी असल्याचे समजते. शिंदे यांनी त्यांच्याबरोबर आलेल्या आमदारांना अजूनपर्यंत नाराज केलेले नाही. त्यामुळे आता राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत काय निर्णय घेणार? हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.