Ajit Pawar Meets Baba Adhav | बाबा आढाव यांच्या आत्मक्लेश आंदोलनाला अजित पवारांची भेट; म्हणाले – ‘पाच महिन्यांत जनतेचा कौल बदलला याला आम्ही काय करणार’

Ajit Pawar-Baba Adhav

पुणे : Ajit Pawar Meets Baba Adhav | गेल्या तीन दिवसांपासून ईव्हीएम विरोधात ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव हे आत्मक्लेश आंदोलन करीत आहेत. विधानसभा निवडणुकीत घोटाळा झाल्याचा, ईव्हीएमचा गैरवापर झाल्याचा संशय आढाव यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजित पवार यांनी बाबा आढाव यांच्या आंदोलनस्थळाला भेट दिली.

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले, ” मला बाबा आढाव यांना सांगायचं आहे की काही गोष्टी या निवडणूक आयोगाशी संबंधित असतात. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. काही गोष्टी सर्वोच्च न्यायालयाच्या अखत्यारित आहेत. त्यात आम्हाला ढवळाढवळ करता येत नाही. त्यांना जे योग्य वाटतं, ते निर्णय त्यांनी दिले आहेत.

मी स्वतः बारामतीचा उमेदवार होतो. मी पाहिलं आहे की संध्याकाळी साडेपाच वाजल्यानंतर मतदारांची गर्दी वाढली होती. मी वेगवेगळ्या मतदान केंद्रांवरील अधिकाऱ्यांना सांगितले होते की सहा वाजेपर्यंत जेवढे मतदार येतील त्या सर्वांसाठी बाहेर विजेची व्यवस्था करा आणि सगळ्यांना मतदान करता येईल याची काळजी घ्या.”

ते पुढे म्हणाले, ” लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या ३१ जागा निवडून आल्या होत्या. आमच्या केवळ १७ जागा आल्या. आम्ही तो पराभव मान्य केला. कारण तो जनतेचा कौल होता. परंतु, तेव्हा कोणीच ईव्हीएम वरून प्रश्न उपस्थित केले नाहीत. माझ्या बारामती विधानसभा मतदारसंघात माझा उमेदवार ४८ हजार मतांनी पाठीमागे होता. मात्र मी त्याच मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत १ लाखाहून अधिक मताधिक्याने निवडून आलो आहे.

कारण बारामतीच्या जनतेचे पहिल्यापासून ठरलेले आहे की लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा. त्यानुसारच ते मतदान करतात. लोकसभा निवडणुकीत ज्या गावांमधून आम्हाला मतदान मिळाले नाही, तिथे मला विधानसभेच्या वेळी भरभरून मतदान मिळाले आहे. आता पाच महिन्यांत जनतेचा कौल बदलला याला आम्ही काय करणार”, असे अजित पवार यांनी म्हंटले आहे.