Manoj Jarange Patil On Kalicharan Maharaj | कालिचरण यांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे प्रत्युत्तर; म्हणाले – ‘टिकली लावलेले स्वतःला…’

एन.पी. न्यूज ऑनलाईन : Manoj Jarange Patil On Kalicharan Maharaj | कालीचरण यांनी छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित केलेल्या एका धार्मिक सभेत मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केली होती. ” हे काही जातीपातीसाठी आरक्षणसाठी नाही तर ,फक्त हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस आहे”, अशी टीका कालीचरण यांनी मनोज जरांगेंवर नाव न घेता केली. या टिप्पणीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. मराठवाड्यातच सदर विधान केल्यामुळे येथील वातावरण तापले आहे.
याबाबत आता मनोज जरांगे यांनी भाष्य केले आहे. माध्यमांशी बोलताना जरांगे म्हणाले, ” मी साधू-संताचा आदर करतो. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदुत्व मानतो. माझ्याबद्दल जे बरळत आहेत, त्यांना बरळू द्यावे. कारण ज्याने एका पक्षाचा ठेका घेतला आहे, अशांबद्दल आपण काही बोलले नाही पाहिजे. संत- महात्म्यांचा आदर करणे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवले आहे. आम्ही ज्या हिंदू धर्मात आहोत, त्यातील सर्वात कट्टार वर्ग आहे मराठा समाज. पण हाच समाज आज अडचणीत आलेला आहे.
ते पुढे म्हणाले,” आम्ही आरक्षण मागतो, याचा अर्थ आम्ही जातीवाद करत नाहीत. आम्ही हिंदूच आहोत. पण गरीबांच्या मुलांना आरक्षण दिले जात नाही. वाकडी टिकली लावलेले स्वतःला धर्माचे रक्षक मानतात. पण धर्माची खरी रक्षक जनता आहे. जनता स्वतःच्या अंगावर वार सोसते.
हे टिकली लावणारे संत फक्त सुपाऱ्या, नारळ, पैसे घेऊ शकतात. खरा हिंदू धर्म वारकरी, गरीब जनता चालवत आहे. हरळ खाऊन जगणारे लोक धर्माचे ठेकेदार नाहीत. मराठा कट्टर हिंदू आहे आणि राहणारच”, असे जरांगे यांनी म्हंटले आहे.
ज्यांच्या मतदारसंघात सदर कार्यक्रम झाला ते शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी कालिचरण यांच्या टिप्पणीवरून हात झटकले आहेत. संजय शिरसाट म्हणाले, ” माझ्या मतदारसंघात कालीचरण यांची जी सभा झाली, त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. मी त्यांना भेटलेलो नाही. त्याठिकाणी माझा बॅनर लागलेला होता. पण माझे नाव सभेशी जोडले गेल्यामुळे गैरसमज निर्माण होत आहे.
जरांगे पाटील आणि माझ्यात जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांच्या आंदोलनात पहिल्या दिवसांपासून आम्ही त्यांना सहकार्य करत आलो आहोत. मराठा समाजामध्ये गैरसमज झाला तर त्याचा परिणाम वाईट होतो. याची जाणीव मला आहे”, असे शिरसाट यांनी म्हंटले आहे.