Maharashtra Assembly Election 2024 | राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बड्या नेत्याचे वक्तव्य; म्हणाले – ‘मविआचे सरकार आल्यास 7 दिवसात केंद्रसरकार पडणार’

मुंबई: Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला निकाल असणार आहे. दरम्यान मुंब्रा (Mumbra Sabha) येथे प्रचारसभेदरम्यान बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (Sharad Pawar NCP) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मोठे विधान केले आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यास ७ दिवसांत केंद्र सरकार पडणार असा असे आव्हाड यांनी म्हंटले आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास पुढील ७ दिवसांत चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) आणि नितीश कुमार (Nitish Kumar) केंद्र सरकारचा पाठिंबा काढून घेतील आणि आम्ही सरकार पाडू, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, ” राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास आम्ही महिलांना प्रतिमहिना ३ हजार रुपये देऊ. महिलांवर अत्याचार करण्याचा कुणीही प्रयत्न करणार नाही आणि आमच्या लहान बहिणींनाही पूर्ण सुरक्षा दिली जाईल. सरकारकडे आमच्या पोलिसांना पगार द्यायला पैसे नाहीत, महागाई वाढली आहे.
सरकारची तिजोरी रिकामी आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून ७ दिवसांच्या आत चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे केंद्र सरकारचा पाठिंबा काढून घेतील”, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.