Maharashtra Assembly Election 2024 | काँग्रेस अन् शिवसेना ठाकरे गटातील वादावर बाळासाहेब थोरात यांचे भाष्य; म्हणाले – ‘आघाडीत बिघाडी वगैरे काही नाही, उलट…’

मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | विदर्भातील जागांवरून काँग्रेस (Maharashtra Congress) आणि ठाकरे गटात (Shivsena Thackeray Group) मतभेद आहेत. येथील जागांवर एकमत होत नसल्याने ही यादी दिल्ली हायकमांडकडे पाठवण्यात आली आहे. लोकसभेला अमरावती आणि रामटेक हे दोन लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडल्याने विधानसभेला विदर्भात चार ते पाच अधिक जागा काँग्रेसने शिवसेना ठाकरे गटाला सोडाव्यात, अशी भूमिका ठाकरे गटाची आहे.
पार पडलेल्या जागावाटपाच्या बैठकीमध्ये संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यामध्ये खटके उडाले आहेत. नाना पटोले यापुढे जागावाटपाच्या बैठकीत असल्यास शिवसेना ठाकरे गटाचे नेते जागा वाटपाच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत, अशी भूमिका शिवसेना ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या भूमिकेविरोधात थेट काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करण्यात आल्याची माहिती आहे.
हा वाद वाढत चालल्याचे पाहून काँग्रेस हायकमांडने दखल घेतली आहे. प्रभारी रमेश चेन्निथला महाराष्ट्रात दाखल झाले असून, ते लवकरच ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. जागा वाटपाचा तोडगा लवकरात लवकर काढून विधानसभा निवडणुकीच्या तयारी लागण्याचा आग्रह महाविकास आघाडीकडून केला जात आहे. काँग्रेसचा देखील तसा आग्रह आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि रमेश चेन्निथला यांच्या भेटीत नेमकं काय होणार, याकडे आता लक्ष लागलं आहे.
दरम्यान या प्रकरणावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ” हा वाद काही मोठा नाही आणि विकोपाला गेलेला नाही. आम्हाला हव्या असलेल्या दोन-चार जागांवर त्यांचा दावा आहे. आणि काही दोन -चार जागांवर तिघांचा दावा आहे. त्यातून चर्चा होत आहे. आघाडीत बिघाडी वगैरे काही नाही. उलट आमच्यात उघड चर्चा होत आहे. इतरांसारखं इथं दबावाखाली चर्चा होत नाही “, असे म्हणत बाळासाहेब थोरातांनी महायुतीला टोला लगावला आहे.