Congress Manifesto | काँग्रेसच्या जाहीरनाम्यात योजनांचा पाऊस; काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास महिलांना महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून प्रतिमहिना 2 हजार रुपये

मुंबई : Congress Manifesto | आगामी विधानसभा (Maharashtra Assembly Election 2024) डोळ्यासमोर ठेऊन महायुती सरकारने (Mahayuti Govt) अनेक योजनांची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची (Ladki Bahin Yojana) राज्यात जोरदार चर्चा आहे. मागील सव्वा तीन महिन्यांत राज्यातील महायुती सरकारने १ जुलै ते १० ऑक्टोबर या काळात तब्बल ७ हजार ६८० शासन निर्णय काढले आहेत. त्यात महाविद्यालयीन मुलींसह वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिक, महिला, शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार तरुण- तरुणींसाठीच्या योजनांचा समावेश आहे.
नाराज घटकांना आकर्षित करण्यासाठी तीन महिन्यात तब्बल दीड लाख कोटींच्या नवनवीन योजना जाहीर केल्या आहेत. त्या योजनांची तातडीने अंमलबजावणी सुरु आहे. या योजना घरोघरी पोहोचवण्यासाठी १० हजाराच्या मानधनावर ५० हजार योजनादूतांची नेमणूक करण्यात आली आहे.
दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळालेल्या काँग्रेसचा आत्मविश्वास वाढलेला आहे. आगामी विधानसभेसाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. दरम्यान काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर चर्चा केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार महिला, युवक, शेतकरी, कामगार, अनुसूचित जाती, जमाती अशा वेगवेगळ्या प्रवर्गासाठी काँग्रेस अनेक आकर्षक योजना लागू करण्याचे आश्वासन देणार आहे.
विशेष म्हणजे या योजनांसाठी नावे देखील ठरवण्यात आल्याचे म्हटले जातेय. सध्याच्या महायुती सरकार कडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रतिमहिना १५०० रुपयांची मदत दिली जाते.
सरकारच्या या योजनेची सध्या सगळीकडे चर्चा चालू आहे. हीच बाब लक्षात घेता काँग्रेस पक्षदेखील सत्तेत आल्यास राज्यातील महिलांना महालक्ष्मी योजनेच्या (Mahalaxmi Yojana) माध्यमातून प्रतिमहिना २००० रुपये दिले जाण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास या योजनेसाठी साधारण ६० हजार कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे.
बेरोजगारांना महिन्याला ४ हजार रुपये देण्याचे आश्वासन काँग्रेस देऊ शकते. या योजनेअंतर्गत साधारण ६.५ लाख युवकांना हा भत्ता दिला जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसतर्फे सर्वांना २५ लाख रूपयांचे विमा कवच दिले जाऊ शकते. या योजनेसाठी ६ हजार ५५६ कोटीचा निधी अपेक्षित आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Govt) आल्यास, आम्ही कृषी समृद्धी शेतकरी सन्मान योजना लागू करू, असे आश्वासन काँग्रेस देण्याची शक्यता आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे ३ लाखापर्यंत कर्ज माफ केले जाणार आहे. ही कर्जमाफी साधारण २८ हजार कोटींची असेल.
स्त्री सन्मान योजनेअंतर्गत महिलांना बस वाहतूक सेवा पूर्णपणे मोफत चालवली जाण्याचे आश्वासन काँग्रेस देऊ शकते. या योजनेचा समावेश जाहीरनाम्यात केला जाऊ शकतो. या योजनेसाठी १ हजार ४६० कोटींचा निधी अपेक्षित आहे.