Shirur Assembly Constituency | शिरूर विधानसभा मतदारसंघातूनही अजित पवारांना विरोध; ते भाजपचे कधीच होऊ शकत नाहीत, भाजप पदाधिकाऱ्यांचा पवित्रा

पुणे : Shirur Assembly Constituency | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर अजित पवारांनी (Ajit Pawar) वेगळा मार्ग निवडत ते महायुतीच्या (Mahayuti) सत्तेत सहभागी झाले. लोकसभेमध्ये शरद पवारांच्या (Sharad Pawar NCP) प्रभावामुळे अजित पवारांना चांगलाच धक्का सहन करावा लागला. त्यातच त्यांच्या हक्काच्या मतदारसंघात बारामतीत (Baramati Lok Sabha) त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा पराभव झाला.
त्यानंतर आता अजित पवारांनी आगामी विधानसभेसाठी कंबर कसली आहे. मात्र दोन दिवसांपूर्वी बारामतीत अजित पवारांनी केलेले वक्तव्य चर्चेत आहे. ‘मी निवडून दिलेल्या उमेदवाराला निवडून द्यावे’, त्यामुळे बारामतीतून पुन्हा एकदा निवडणूक न लढण्याचे संकेत अजित पवारांनी दिले आहेत.
त्यानंतर आता अजित पवार विधानसभा निवडणूक नेमक्या कुठल्या मतदारसंघातून लढवणार याच्या चर्चा सुरू झाल्या. त्यानंतर अजित पवार हे शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातुन निवडणूक लढणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आमदार अशोक बापू पवार (Ashok Pawar) यांच्याविरोधात अजित पवार अशी लढत होण्याची शक्यता आहे.
शिरूर हवेली हा विधानसभा मतदारसंघ भाजपचा पारंपारिक मतदार संघ आहे. शिवसेना भाजपची युती असताना देखील हा मतदारसंघ भाजपकडेच राहिला होता. मात्र, यंदाच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघासाठी भाजपकडून कोणतीही दखल घेतली गेलेली नाही.
त्यामुळे हा मतदारसंघ भाजपने सोडला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघ जर अजित पवारांना मिळाला, तर तिथून शरद पवार गटाचे आमदार अशोक बापू पवार यांच्या विरोधात अजित पवार हे निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मात्र आता शिरूरमधून अजित पवारांना विरोध होताना दिसत आहे. शिरूर हवेली विधानसभेची जागा भाजपलाच राहिली पाहिजे. पक्षाने ही उमेदवारी देताना निष्ठावंतांना उमेदवारी द्यावी. ज्यांच्या मनात राष्ट्रवादीचे विचार आहेत ते भाजपचे कधीच होणार नाही. याचा विचारही पक्षाने करावा, असा सूर भाजपच्या पदाधिकाऱ्यानी काढला आहे. काही भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक वाघोलीत पार पडली. या बैठकीतून भाजपची अंतर्गत गटबाजी दिसून आली आहे.
या बैठकीसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य जयश्री पलांडे, किसन मोर्चाचे उपाध्यक्ष दादा सातव, रोहिदास उंद्रे, प्रवीण काळभोर, संजय पाचंगे, प्रवीण काळभोर, पुनम चौधरी, अनिल सातव, केतन जाधव, रामदास हरगुडे आदी उपस्थित होते.
जयश्री पलांडे म्हणाल्या, फक्त काही ठेकेदार लोकांना बरोबर घेऊन आमदार होऊ शकत नाही, गटातटाचे राजकारण बाजूला ठेवून काम करावे लागेल, शिरूर हा पहिल्या पासूनच भाजपचा व संघाचा बालेकिल्ला आहे. म्हणूनच भाजपच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांला संधी मिळायला हवी.
रोहिदास उद्रे म्हणाले, शिरूर हवेलीत आताची परिस्थिती पक्ष वाढवायचा की गट वाढवायची अशी झाली आहे. या परिस्थितीमुळे आपला आमदार कसा होणार. नुसता पैसा चालणार नाही. आताच्या टोळीचा भाजपमधील सच्चा कार्यकर्ता काम करणार नाही. आमच्याबाबत मनात तिरस्कार आहे.