Nitin Gadkari On Ladki Bahin Yojana | ‘सरकारच्या भरवशावर राहू नका, सरकार ही विषकन्या’, नितीन गडकरींचे विधान चर्चेत; म्हणाले – “लाडकी बहीण सुरु केल्यामुळे…”

नागपूर : Nitin Gadkari On Ladki Bahin Yojana | केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे रोखठोकपणे अनेकदा राजकारण्यांसह अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावताना पाहायला मिळतात. दरम्यान गडकरी यांनी केलेल्या विधानाची चर्चा सुरु आहे. नागपूरमध्ये आयोजित ‘ऍडवॅनटेज विदर्भ’ या उद्योजकांसाठीच्या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरींनी विदर्भातील उद्योजक आणि गुंतवणूकदारांना एक महत्त्वपूर्ण सल्ला दिला. (Mahayuti Govt)
तसेच राजकीय पक्षांबाबतही गडकरींनी भाष्य केले. सरकारच्या भरवशावर राहू नका. सरकार ही विषकन्या असते, असे नितीन गडकरींनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेचाही उल्लेख केला.
“कोणत्याही पक्षाचे सरकार असो. सरकारला तुमच्यापासून दूर ठेवा. सरकार ही विषकन्या असते ज्याच्यासोबत जाते त्याला बुडवते. त्यामुळे उद्योजकांनी यांच्या लफड्यात पडू नये. सबसिडी घ्यायची असेल तर घ्या. पण सबसिडी कधी मिळेल याचा काही भरवसा नाही.
माझ्या मुलाने सांगितले की ४५० कोटी रुपये अनुदान मिळाले आहे. मुलाने विचारलं की अनुदान कधी मिळणार. त्याला म्हटलं देवाला प्रार्थना कर. कारण काही भरवसा नाही की अनुदान मिळणार की नाही”, असे नितीन गडकरी यांनी म्हंटले.
अनुदानाविषयी बोलताना नितीन गडकरी यांनी महायुती सरकारच्या महत्त्वांकाशी लाडकी बहीण योजनेचाही उल्लेख केला. लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर भार पडत असल्याची टीका विरोधकांकडून होत असताना नितीन गडकरी यांनीही याबाबत भाष्य केले.
“सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केल्यामुळे त्यांनाही अनुदानाचे पैसे त्या योजनेसाठी द्यावे लागत आहेत. यामुळे अनुदानाच्या पैशांची शाश्वती नाही”, असेही गडकरी यांनी सांगितले.