Shivsena UBT Leader On Maharashtra Congress | काँग्रेसच्या मुख्यमंत्री पदाच्या दाव्यावर शिवसेना ठाकरे गटाचे प्रत्युत्तर; म्हणाले – “आमच्यामुळं जागा वाढल्या, कोणाला खुमखुमी असेल तर…”

मुंबई : Shivsena UBT Leader On Maharashtra Congress | आगामी विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) तयारी सुरु आहे. सर्व पक्षांचे नेते दौरे, सभा, बैठका यामध्ये व्यस्त आहेत. महाविकास आघाडीत जागावाटपावर (Mahavikas Aghadi Seat Sharing) चर्चा सुरु आहेत. दरम्यान मुख्यमंत्री पदासाठी चढाओढ दिसत आहे. शिवसेना ठाकरे गटानंतर आता काँग्रेसनेही आगामी काळात मुख्यमंत्री काँग्रेसचा असेल असा दावा केला आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
‘लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यांनी आता मुख्यमंत्री पदावरही दावा केला आहे’, हा प्रश्न माध्यमांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, ” लोकसभा निवडणुकीनंतर आमचा सर्वांचाच आत्मविश्वास वाढला आहे. मात्र आता विधानसभा निवडणूक आहे. या निवडणुकीत आत्मविश्वास मिळावा यासाठी एकत्र काम करावे लागेल. तिन्ही पक्षांना एकत्र राहावं लागेल आणि काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला म्हणून ते काही एकटे लढणार नाहीत.
तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय ते शक्य होणार नाही. महाविकास आघाडी घट्ट झाल्याशिवाय आत्मविश्वास कसा वाढेल? आत्मविश्वास वाढला आहे, असं कोणाला वाटत असेल तर तो आत्मविश्वास कोणाचा आहे? कशामुळे आहे? कसा आहे? हा अभ्यासाचा विषय आहे.”
ते पुढे म्हणाले, “महाविकास आघाडीत तीन प्रमुख पक्ष आहेत, आम्ही एकत्र निवडणुका लढू. कोणाला खुमखुमी असेल की लहान भाऊ, मोठा भाऊ, लाडका भाऊ तर महाराष्ट्रात काय चित्र आहे हे भविष्यात कळेल. काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेत्यांच्या भूमिका स्पष्ट आहेत. काँग्रेसला लोकसभेत जागा जास्त मिळाल्या. पण त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की त्यांच्या जागा वाढण्यात शिवसेनेचं योगदान किती आहे “, असेही राऊत यांनी म्हंटले आहे.