Chandrakant Patil On Ajit Pawar NCP | अजित पवार महायुतीसोबत आल्याने अनेक जागांवर अडचण? विचारलेल्या प्रश्नावर मंत्री चंद्रकांत पाटलांचं भाष्य; म्हणाले – ‘वाजपेयी सरकारमध्ये …’

पुणे: Chandrakant Patil On Ajit Pawar NCP | भाजप (BJP) आणि शिवसेना शिंदे गटाच्या (Shivsena Shinde Group) महायुतीत (Mahayuti) अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा सहभाग झाल्याने जागावाटपावरून रस्सीखेच सुरु आहे. अजित पवारांच्या सहभागाने अनेक मतदारसंघात शिवसेना शिंदे गट आणि भाजपाचे आमदार नाराज आहेत. त्याठिकाणी बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
याबाबत मंत्री चंद्रकांत पाटील यांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. चंद्रकांत पाटील म्हणाले, “भाजप चार जागांचा त्याग करण्यास तयार आहे. मात्र महायुतीचं सरकार आलं पाहिजे.
अजितदादा महायुतीसोबत आल्याने अनेक जागांवर अडचण निर्माण झाली आहे,’ असा प्रश्न विचारल्यावर चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, “वाजपेयी सरकारमध्ये भाजपसोबत २४ पक्ष होते. २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपचं बहुमतावर सरकार निवडून आलं. पण, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत खोट्या ‘नॅरेटिव्ह’ मुळे गडबड झाली. तरीही मोदींनी ‘एनडीए’ तील मित्रपक्षांना सोबत घेतले. मंत्रिपदे दिली. ते मनाने उदार आहेत.”
ते पुढे म्हणाले, “वाजपेयी यांना २४ पक्षांना सोबत घ्यावं लागलं होतं. महाराष्ट्रात १९९५ ते १९९९ युतीचं सरकार असताना शिवसेना सोबत होती. सहयोगी पक्षांना सोबत घेतल्याशिवाय फार कुणाला सरकार स्थापन करता आलं नाही. त्यामुळे अजितदादा काय आणखी कुणी पक्ष सोबत यायला तयार असतील, तर चार जागांचा त्याग करण्यास भाजप तयार आहे. मात्र, बहुमताचं सरकार आणायचं आहे,” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.