Yugendra Pawar On Viral Letter To Sharad Pawar | हे सगळं आता कुठेतरी थांबलंच पाहिजे; युगेंद्र पवार यांची निनावी पत्रावर प्रतिक्रिया

एन.पी.न्यूज ऑनलाईन – Yugendra Pawar On Viral Letter To Sharad Pawar | “हे सगळं आता कुठेतरी थांबलं पाहिजे. हे आत्ताच नाही तर लोकसभेपासून सुरू आहे. हे कोण पाठवते, कोण काय करतोय. याबाबत आम्हाला काहीच माहिती नाही. या पत्रासंदर्भात बारामतीकरांनी मिळून थांबवलं पाहिजे.” अशी प्रतिक्रिया युवा नेते युगेंद्र पवार यांनी मंगळवारी बारामतीत दिली.
ऐन विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) तोंडावर बारामतीत निनावी पत्र सोशल मीडियावर व्हायरल होण्याचा सिलसिला सुरु आहे. या अगोदर बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे नाव न घेता त्यांना उद्देशून एक निनावी पत्र व्हायरल झालं होतं, आता पुन्हा एकदा शरद पवारांना उद्देशून एक निनावी पत्र “कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे” या मथळ्याखाली ‘गब्बर’ नावाने हे पत्र व्हायरल झाल आहे. याबाबत युवा नेते युगेंद्र पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते मंगळवारी बारामती दौर्यावर आले होते. यावेळी त्यांनी पक्ष कार्यालयात आज माध्यमांशी संवाद साधला. (Baramati News)
समोरासमोर येऊन बोललं पाहिजे
यावेळी ते म्हणाले की, हे सगळं आता कुठेतरी थांबलं पाहिजे. हे आत्ताच नाही तर लोकसभेपासून सुरू आहे. हे कोण पाठवते, कोण काय करतोय. याबाबत आम्हाला काहीच माहिती नाही. या पत्रासंदर्भात बारामतीकरांनी मिळून थांबवलं पाहिजे. जर काही असेल तर समोरासमोर येऊन बोललं पाहिजे. एवढाच विषय आहे. हे पत्र व्हायरल करणाऱ्यांना मी विनंती करतो की, त्यांनी अशी पत्र व्हायरल करू नयेत. तुम्हाला जर काही आरोप करायचेच असतील तर पुढे येऊन करा. असेही युगेंद्र पवार यावेळी म्हणाले.
‘स्वाभिमान यात्रे’ला चांगला प्रतिसाद
युगेंद्र पवार यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून बारामती तालुक्यात ‘स्वाभिमान यात्रा’ (Swabhiman Yatra) सुरू आहे. या यात्रेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तालुक्यातील सर्व गावांसह वाड्या वस्त्यांमध्ये आपण फिरत आहोत. याला सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेदरम्यान लोकांकडून येणाऱ्या समस्यांवर काम करणार आहोत. शिक्षण, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, महिला सुरक्षितेचे प्रश्न, पाण्याचे प्रश्न, यावर आपण काम करत आहोत.