Supriya Sule On Mahayuti Govt | ‘सरकारने माझी सुरक्षा काढून घ्यावी’, महायुती सरकारच्या भूमिकेवर सुप्रिया सुळे संतप्त, म्हणाल्या – “…तर मला फाशीची शिक्षा द्या”

पुणे: Supriya Sule On Mahayuti Govt | बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर (Badlapur School Girl Incident) नागरिकांचा उद्रेक झाला. याप्रकरणी संतप्त झालेल्या जमावाने ज्या शाळेत मुलींवर अत्याचार झाला होता, त्या शाळेची तोडफोड केली आहे.

तर दुसरीकडे संतप्त जमावाने बदलापूर रेल्वे स्थानकात आंदोलन करत ठिय्या मांडल्याने रेल्वे सेवा ठप्प झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान पोलिसांकडून लाठीचार्जही करण्यात आला. शेकडो आंदोलकांवर गुन्हे दाखल करून काहींना ताब्यातही घेण्यात आले आहे. या घटनेवरून राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे.

बदलापूर येथे घडलेल्या लैंगिक अत्याचार (Badlapur Sexual Harassment Case) प्रकरणावर भाष्य करत खासदार सुप्रिया सुळे यांनीही संतप्त होत प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, “जर बलात्काराच्या विरोधात आंदोलन करणं गुन्हा असेल तर तो मला मान्य आहे. मला सरकारनं फाशीची शिक्षा द्यावी, पण आम्ही बलात्कार झालेल्या मुलीच्या कुटुंबाच्या बाजूने उभे राहणार. आम्ही आंदोलनं करणार.

जोपर्यंत या राज्यातली प्रत्येक महिला व नागरिक सुरक्षित नाहीत, तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहणार. या सरकारनं आम्हाला जेलमध्ये टाकावं किंवा फाशी द्यावी”, अशी प्रतिक्रिया सुळे यांनी दिली आहे.

त्या पुढे म्हणाल्या, “तुम्ही माझ्यासारख्या असंख्य लोकांना सुरक्षा दिली आहे. मी ऐकलं की आमदार-खासदार, लोकप्रतिनिधी, अगदी त्या आसामला गेलेल्या सगळ्यांनाही सुरक्षा दिली आहे. माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीला या सुरक्षेची खरंच गरज नाही.

मीही तुमच्यासारखीच या राज्याची नागरिक आहे. जेवढी माझी सुरक्षा महत्त्वाची तेवढीच या राज्यातल्या प्रत्येक नागरिक व महिलेची सुरक्षाही महत्त्वाची आहे. त्यामुळे माझी सुरक्षा काढून घ्यावी आणि ती राज्यातल्या प्रत्येक लेकीला आणि नागरिकाला द्यावी”, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे.