Maharashtra Assembly Election 2024 | महायुतीत तणाव! ‘महायुती फक्त भाजपची गरज नाही,आमचे नेतेही मनावर दगड ठेवून महायुतीत…’, भाजपचा निशाणा

मुंबई: Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणूका तोंडावर असताना महायुतीतील (Mahayuti) वाद आता चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. महायुतीच्या पक्षातील नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) कुचकामी मंत्री आहेत, असा हल्लाबोल करत देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) रवींद्र चव्हाणांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी रामदास कदमांनी (Ramdas Kadam) केली आहे. गेल्या १४ वर्षापासून मुंबई-गोवा महामार्गाचे (Mumbai Goa Highway) काम होत नाही. चाकरमान्यांचे हाल होत आहेत.
समृद्धी महामार्गाचे काम तीन वर्षात पूर्ण होते. मग मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण का होत नाही? असा प्रश्न रामदास कदमांनी उपस्थित केला. रवींद्र चव्हाणांना शिवसेनेची एलर्जी आहे. रवींद्र चव्हाण कुचकामी मंत्री आहेत, अशी टीका रामदास कदम यांनी केली. या टीकेला आता भाजपाकडून सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
भाजपच्या संयमाला दुबळेपणा समजू नका. महायुतीची गरज एकट्या भाजपला नाही, असा इशारा प्रवीण दरेकर यांनी दिला आहे. दरेकर म्हणाले, रामदास कदम हे महायुती मधील ज्येष्ठ नेते आहेत. मात्र, त्यांचे रवींद्र चव्हाण यांच्याबद्दलचे वक्तव्य अपरिपक्व म्हणावे लागेल. रामदास कदम यांना काही समस्या असेल तर चार भिंतीच्या आत ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या समोर मांडायला पाहिजे होती.
पण त्यांचा स्वभाव हा खळबळजनक बोलण्याचाच आहे. महायुतीचा धर्म हा पाळलाच गेला पाहिजे. अन्यथा आरे ला कारे आम्हालाही करता येते. महायुती फक्त भाजपची गरज नाही. आमचे कार्यकर्तेही मनावर दगड ठेवून महायुतीत लढत आहेत, असा इशारा प्रवीण दरेकर यांनी दिला.