Ajit Pawar | अजित पवारांचा गोरगरिब महिलांना सल्ला, अल्ला किंवा देवाच्या कृपेने नव्हे, नवर्याच्या कृपेने मुलं-बाळं होतात, दोनवरच थांबा

पुणे : Ajit Pawar | माय-माऊलींनो वाईट वाटून घेऊ नका. मला सगळ्या जाती धर्माच्या महिलांना हात जोडून सांगायचे आहे. मुलं, बाळं होतात. देवाची कृपा, अल्लाची कृपा नसते. ही नवर्याची कृपा असते म्हणून मुलं बाळं होतात. त्यामुळे दोन अपत्यावर थांबा…, असा प्रेमळ सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी गोरगरिब महिलांना दिला. पुण्यातील मावळमध्ये जनसन्मान यात्रेतील महिला मेळाव्यात ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर सभा मंडपात एकच हशा पिकला. ते पुढे म्हणाले, माझ्या मावळात आदिवासी समाज, मागासवर्गीय समाज आहे. लहान कुंटुब ठेवले तर या योजनांचा फायदा तुम्हाला अधिक होईल. त्या दोन मुलांचे चांगले संगोपन करता येईल. तसेच चांगले शिक्षण देता येईल. तुम्हाला पण चांगले जीवन जगता येईल.
अजित पवार म्हणाले, दोन कोटी महिलांना पैसे देणार आहोत. बजेटमध्ये तरतूद केलेली आहे. कोणी काहीही म्हणेल, आम्ही पैसे परत घेणार नाही. रक्षाबंधनाला भावाला राखी बांधणार्या बहिणीला दिलेली ओवाळणी परत घेतो का? अजिबात नाही. कोणी काहीही अफवा पसरवत आहे, तुम्हाला हे पैसे कायम भेटतील. पुढचे लाईट बिल येणार नाही अन् मागचे लाईट बिल भरायचे नाही.
गुलाबी जॅकेटच्या चर्चेबाबत अजित पवार म्हणाले, अनेक जण मला म्हणतात दादा गुलाबी रंगाचे जॅकेट घालत आहात, महिलांना आवडते म्हणून का? हो, महिलांना आवडते म्हणून घालतो. त्यात काही मी वेडेवाकडे केले का? उगाच काहीही बोलायचे म्हणून बोलतात, असे पवार म्हणाले.