Pune Flood | पुण्यातील पूरग्रस्तांना मोठा दिलासा! नुकसान भरपाई मिळणार; जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिली माहिती

पुणे : Pune Flood | मागील जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यासह शहरात अतिवृष्टी झाली. त्यामुळे धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने पुणे व परिसरामध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. या पुरामुळे मुठा नदीकाठी राहणाऱ्या अनेकांच्या घरात पाणी शिरले. अनेकांच्या गाड्यांचे नुकसान झाले. दरम्यान गाड्यांचा इन्शुरन्स असल्यास संबंधितांना दिलासा मिळाला आहे. (Pune Rains)
जुलैमधील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून, याबाबतचा अहवाल ८ कोटी २३ लाख ६७ हजार ५०० रुपयांच्या निधीची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून (Pune Collector Office) राज्य शासनाकडे करण्यात आली आहे. त्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे पुन्हा धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने मुठा नदीकाठच्या (Mutha River) नागरी वस्तीत पाणी शिरले होते.
पुणे शहरातील सिंहगड रस्ता, ढोले पाटील, येरवडा, नगर रस्ता, शिवाजीनगर-घोलेरस्ता, वारजे-कर्वेनगर, कसबा-विश्रामबाग वाडा आणि औंध-बाणेर या क्षेत्रीय कार्यालयांच्या परिसरातील ५३७ कुटुंबांतील १९०६ नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले होते.
पिंपरी-चिंचवडमधील ३०५ कुटुंबातील १३६५ नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले होते. तसेच खेड तालुक्यात सागर घेर (वय-३५, रा- धामारी, खेड) या तरुणाचा पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे, असे जिल्हा प्रशासनाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या नुकसानीचे पंचनामे पुन्हा करण्यास सुरुवात झाली आहे.
याबाबत बोलताना जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे (Suhas Diwase) म्हणाले, धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्याने मुठा नदीकाठच्या नागरी वस्तीत पाणी शिरले होते. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पुन्हा करण्यास सुरुवात झाली आहे. अनेक नागरिकांच्या विशेषतः पुणे शहरातील अनेक नागरिकांच्या वाहनांचे पुराच्या पाण्याने नुकसान झाल्याचे समोर येत आहे. मुख्यमंत्री पाहणीसाठी पुण्यात आले होते. तेव्हाही ही बाब बाधित नागरिकांनी निदर्शनास आणून दिली.
या पार्श्वभूमीवर झालेल्या नुकसानीचे पंचनामे केल्यानंतर संबंधित नागरिकांना पंचनाम्याची कॉपी उपलब्ध करून दिली जाईल. ही कॉपी वाहनांच्या नुकसान भरपाईसाठी इन्शुरन्स कंपनीला पाठवण्यात येणाऱ्या क्लेमसोबत जोडता येईल. त्यामुळे संबंधितांना इन्शुरन्स मिळण्यास मदत होईल असा निर्णय घेण्यात आला आहे.