Sharad Pawar On Maratha-OBC Reservation | मराठा-ओबीसी आरक्षण वादावर शरद पवारांनी व्यक्त केली चिंता, ”तेथील कटुता, अवविश्वासाचं चित्र भयावह, मी कधीही असं…”

Sharad-Pawar

मुंबई : Sharad Pawar On Maratha-OBC Reservation | महाराष्ट्रातील जालना, बीड यासारख्या जिल्ह्यांत अस्वस्थता आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन संपल्यावर मी शांतपणे जाऊन तिथल्या लोकांशी संवाद साधणार आहे. तिथे कटुता, अविश्वासाचे चित्र असून ते भयावह आहे. मी महाराष्ट्रात कधीही असे ऐकलेले नाही. दोघांमध्ये सामंजस्य कसे करता येईल यावर अधिक लक्ष देणे गरजेचे आहे, असे वक्तव्य ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मराठा-ओबीसी आरक्षण वादावर केले. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

शरद पवार म्हणाले, एका समाजाचे हॉटेल असेल तर दुसऱ्या समाजाचे लोक तिथे चहा घ्यायलाही जात नाहीत, असे मी महाराष्ट्रात कधीही ऐकलेले नाही. हे काहीही करून बदलले पाहिजे. लोकांमध्ये विश्वास वाढवला पाहिजे. संवाद वाढला पाहिजे.

शरद पवार पुढे म्हणाले, आमच्यासारख्या लोकांनी यासाठी जीव ओतून काम केले पाहिजे. यासाठी मुळात संवाद ठेवायला पाहिजे. पण आज संवाद संपलेला आहे. सार्वजनिक जीवनात जेव्हा संवाद थांबतो तेव्हा चुकीच्या समजुती वाढतात. त्यामुळे संवाद गरजेचा आहे. या प्रक्रियेत आमच्यासारख्या लोकांनी यात अधिक लक्ष द्यायला हवे.

शरद पवार यांनी म्हटले की, दुर्दैवाने आता दोन वेगवेगळे वर्ग पडले आहेत. त्या दोन वर्गांना कोणी-कोणी काय तरी सांगितले आहे. आजच्या राज्यकर्त्यांनी दोन बाजू घेतल्या आहेत. एका गटाने ओबीसींची बाजू घेतली आहे. तर एका गटाने मराठा आंदोलकांची बाजू घेतली आहे. हे योग्य नाही.

ते पुढे म्हणाले, सामंजस्य कसे निर्माण कराचे यावर अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. मी सांगितल्याप्रमाणे संवाद वाढवणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने प्रकरणात अजिबत लक्ष घातलेले नाही, अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त केली.