Sharad Pawar On Vidhan Parishad Election | शरद पवारांनी सांगितलं विधानपरिषदेतल्या जयंत पाटलांच्या पराभवाचं गणित; म्हणाले…

पुणे : Sharad Pawar On Vidhan Parishad Election | शेकापचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांचा विधानपरिषद निवडणुकीत पराभव झाला. शरद पवार गटाने या निवडणुकीत त्यांना पाठिंबा दिला होता. मात्र त्यांचा पराभव का झाला याबाबत शरद पवार यांनी भाष्य केले आहे. पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
माध्यमांशी बोलताना पवार म्हणाले, काँग्रेसकडे अधिकचे मतं होती. आमच्याकडे 12 मतं होती. ठाकरे गटाकडे आमच्यापेक्षा जास्त मतं होती. काँग्रेसने पहिली मतं त्यांच्या उमेदवाराला देणं साहजिकच आहे. पण, उरलेली पहिली आणि दुसऱ्या पसंती क्रमाची मतं योग्यपणे दिली असती तर तिन्ही उमेदवार निवडून आले असते. पण, आमची रणनीती चुकली.
जयंत पाटील यांच्याबाबत महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांमध्ये निर्णय झालेला नव्हता. माझ्याकडे 12 मतं होती. शेकापच्या उमदवाराला पाठिंबा द्यावा असं आम्हाला वाटत होतं. कारण, लोकसभा आम्ही डाव्या पक्षांसोबत लढवली होती. त्यांनी काही जागा मागितल्या होत्या, पण ते आम्ही देण्याच्या स्थितीत नव्हतो. त्यामुळे जयंत पाटील यांना आम्ही पाठिंबा देण्याचं ठरवलं होतं”, असं शरद पवार म्हणाले.
“संधी आली तर डाव्यांना प्राधान्य द्यावं असं मला वाटत होतं. काँग्रेसची मतं जास्त होती. ठाकरेंकडे पुरेसी मतं नव्हती. पण, त्यांनी उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला. रणनीतीमध्ये मतभिन्नता होती. माझं व्यक्तिगत गणित वेगळं होतं. निवडून येण्यासाठी 23 मतं आवश्यक होती. काँग्रेसकडे माझं म्हणणं होतं, तुमच्या उमेदवाराला मतं देऊन उरलेली मतं 50 टक्के ठाकरे गटाला द्या आणि 50 टक्के मतं जयंत पाटलांना द्या. गरजेपेक्षा जास्त मतं असल्याने ती ट्रान्सफर होत होती. जास्तीच्या काँग्रेस आमदारांनी पहिलं मत ठाकरेंना द्यावं आणि ठाकरेंच्या आमदारांनी दुसरं मत शेकापला द्यावं, हे जर गणित जुळून आलं असतं तर तिन्ही उमेदवार निवडून आले असते. हे गणित सगळ्यांना मान्य झालं नाही. त्यामुळे जयंत पाटील निवडून येऊ शकले नाहीत असे शरद पवार यांनी सांगितले.