Majhi Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींना राखीपोर्णिमेलाच मिळणार पंधराशेची भेट

ajit-pawar-34

पुणे : Majhi Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. ही योजना दोन ते तीन महिनेच टिकेल असा दावा विरोधक करीत आहेत. सुरुवातीला या योजनेच्या पात्रतेचे नेमके निकष काय यावरुन बराच गोंधळ उडाला होता. आता कुठे याबाबत स्पष्टता आल्यानंतर अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झालेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार, याचे वेध लागले आहेत.

१ जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी सुरु झाली आहे. त्यामुळे महिलांच्या बँक खात्यात जुलै महिन्यापासूनचे पैसे येणार आहेत. परंतु, अजूनही अर्ज भरण्याचीच प्रक्रिया सुरु असल्याने योजनेचे पैसे कधी मिळणार, हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

दरम्यान लाडकी बहीण योजनेला लाभ येत्या राखी पौर्णिमेपासूनच सुरू होईल. राज्यातील दीड कोटी महिलांच्या खात्यात त्यादिवशी प्रत्येकी पंधराशे रुपये जमा होतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) यांनी सांगितले. या योजनेमुळे राज्य आर्थिक संकटात जाईल, या विरोधकांच्या आरोपाला काहीही अर्थ नाही, असा दावाही पाटील यांनी केला. राज्यातील अटीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ होईल, असे ते म्हणाले.

योजनेची माहिती देण्यासाठी पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पाटील यांनी विरोधक कसलीही माहिती न घेता बोलतात, अशी टीका केली. शहराध्यक्ष दीपक मानकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, वैशाली नागवडे तसेच पक्षाचे अन्य स्थानिक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. पाटील म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वक्तव्यावर बोलण्याइतका मी मोठा नाही, मात्र अजित पवार यांनी या योजनेसाठी आर्थिक तरतूद करण्यापूर्वी ते बोलले आहेत हे लक्षात घ्यायला हवे.

राज्याने कर्ज काढण्याची मर्यादा अजून पार केलेली नाही. अर्थसंकल्पात महिला, शेतकरी, तरुण, विद्यार्थी, अल्पसंख्याक अशा विविध घटकांसाठी योजना जाहीर केल्या आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांकडे लाडकी बहीण योजनेचे अर्ज देऊ नका, असे कोणी सत्ताधारी नेते म्हणत असतील तर ते चुकीचे आहे. माता भगिनींना लाभ मिळणे गरजेचे आहे. मग तो कोणाच्यामार्फत मिळाला, तरी काही हरकत नाही, असे पाटील म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत कोणी कोणाबरोबर गेले म्हणून नुकसान झाले, असे होत नाही. जे असे बोलतात ते त्यांच्या पक्षात असे विश्लेषण करण्याइतके मोठे नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय अनेक पक्ष देशात भारतीय जनता पक्षाबरोबर आले-गेले आहेत. त्यामुळे आमच्यामुळे त्यांचा पराभव झाला किंवा त्यांच्यामुळे आमचे नुकसान झाले, या आरोपांमध्ये काहीही अर्थ नाही”, असे उमेश पाटील यांनी म्हंटले आहे.