Pune Rains | घाट माथ्यावर जोरदार पावसाचा इशारा; पावसाळी पर्यटनाला न जाण्याचे हवामान तज्ज्ञांचे आवाहन

पुणे: मागील ७२ तासांपासून घाटमाथ्यावर अतिवृष्टी होत असून कोकण, घाट माथा, मध्य महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवस जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. रविवारी रायगड , पाटगाव या भागामध्ये अतिवृष्टी झाली त्यामुळे सध्यातरी पावसाळी पर्यटन करू नये असे आवाहन करण्यात येत आहे. पुणे व सातारा घाट विभागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या ७२ तासामध्ये दरड प्रवण क्षेत्रामध्ये प्रचंड पावसाची नोंद झाली. पावसाचे प्रमाण असेच कायम राहणार असण्याची शक्यता आहे. घाट आणि कोकण परिसरात पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील दोन दिवसांमध्ये दरडींची शक्यता वाढणार आहे. म्हणून पावसाचा जोर ओसरेपर्यंत पावसाळी पर्यटन टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात विदर्भ, कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस झाला आहे. आणखी २ ते ३ दिवस पावसाचा जोर राहणार आहे. कोकणात पावसाचा जोर अधिक असून, सिंधुदूर्ग, रत्नागिरीला रेड अलर्ट दिला आहे. रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे.

पुणे आणि सातारा जिल्ह्यातही घाटमाथ्यावर काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा इशारा दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला असून, या जिल्ह्यातील पाटगाव धरणामध्ये रविवारी तब्ब्ल ३२५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.विदर्भ , खान्देश , मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यामध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. मंगळवारी (दि.९) सिंधुदुर्ग ,पुणे , सातारा जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

“गेल्या ३ ते ४ दिवसांपासून कोकणातील मुंबईसह उपनगर, ठाणे, पालघर येथे पाऊस होतो आहे. पण गोव्यासहित संपूर्ण सिंधुदुर्ग, दक्षिण रत्नागिरी, तसेच रायगड जिल्ह्यातील काही भागात अधिक तीव्रतेचा पाऊस होत आहे. १२ जुलैपासून उत्तर कोकणातील जिल्ह्यात अधिक पावसाची शक्यता जाणवते, अशी माहिती माणिकराव खुळे, सेवानिवृत्त हवामानतज्ज्ञ, पुणे यांनी दिली आहे.