Vishwa Hindu Parishad On Nawab Malik | ‘नवाब मलिक यांना अजित पवारांनी दूर ठेवावे’ ; भाजपानंतर विश्व हिंदू परिषदेची भूमिका

मुंबई : Vishwa Hindu Parishad On Nawab Malik | आगामी निवडणुकांची तयारी सुरु झालेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची आणि आमदारांची बैठक (दि २) पार पडली होती. अजित पवारांचे शासकीय निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर ही बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare), छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्यासह इतर नेते हजर होते. या बैठकीला पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक हे देखील उपस्थित होते. भाजपाकडून मलिक यांच्या महायुतीतील (Mahayuti) प्रवेशाला जाहीर विरोध केलेला असताना अजित पवारांनी मलिकांना बैठकीस बोलवल्याने महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया आल्याचे पाहायला मिळाले.
भाजपच्या नेत्यांकडूनही प्रतिक्रिया देण्यात आल्या. मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपामुळे अटकेची कारवाई झाल्यानंतर काही महिन्यांपूर्वी वैद्यकीय कारणास्तव नवाब मलिक हे जामिनावर तुरुंगाबाहेर आले आहेत. तुरुंगाबाहेर येताच नवाब मलिकांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आपले समर्थन दिले होते. तसेच अधिवेशन काळात ते सत्ताधारी बाकांवरही बसले होते. मात्र गंभीर आरोप असलेले मलिक हे महायुतीसोबत नकोत, अशी भूमिका घेत भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांना पत्र लिहिले होते.
त्यानंतर आता विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनीही नवाब मलिक यांना अजित पवारांनी दूर ठेवावे अशी भूमिका घेतली आहे. मात्र विधानपरिषद निवडणुकीत नवाब मलिक यांची गरज असली तरी सक्रिय राजकारणात मलिक यांना सोबत घेऊ नये, असे विश्व हिंदू परिषदेचे विदर्भ प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांनी म्हंटले आहे. विधानपरिषद निवडणुकीत अजित पवारांना एक-एक मत महत्वाचे आहे. नवाब मलिक या निवडणुकीत मतदार आहेत. त्यामुळे ते अजित पवारांच्या बैठकीला आले असतील. पण भाजपसोबत नवाब मलिक सक्रिय राजकारणात असणे हे या देशातील आणि प्रांतातील कोणीही नागरिक सहन करीत नाही याबाबत अजित पवार यांनी दक्षता घ्यावी, असे शेंडे यांनी म्हंटले आहे.
“नवाब मलिक कोणत्याही संघटनेशी जोडले गेलेले नाहीत. ते आपल्या मतदारसंघातील तसेच विधानसभेतील कामासाठी अजित पवारांना भेटत असतील त्यामुळे गैरसमज करण्याची आवश्यकता नाही”, असे अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हंटले आहे. तर नवाब मलिक आमच्यासाठी अडचणीचे ठरण्यापेक्षा अजित पवार हे त्यांच्याबाबत काय भूमिका घेतात हे महत्वाचे असल्याचे शिंदे गटाचे म्हणणे आहे.