NCP Sharad Pawar On Devendra Fadnavis | ‘देवेंद्र फडणवीसांकडून वास्तव गोष्टींनाच फेक नरेटिव्हचं लेबल’ – शरद पवार गट

Sharad-Pawar-12

बारामती : NCP Sharad Pawar On Devendra Fadnavis | आगामी विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Election) डोळ्यासमोर ठेऊन सत्ताधाऱ्यांनी अर्थसंकल्पादरम्यान योजनांचा पाऊस पाडला. आता यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. विरोधक सातत्याने फेक नरेटिव्ह पसरवत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. याबाबत आता शरद पवार गटाकडून फडणवीसांच्या या विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने या संदर्भातील पोस्ट एक्स या सोशल मीडिया साईटवर केली आहे. यामध्ये म्हटले आहे की, ” संविधान बदलण्यासाठी आम्हाला ४०० खासदार हवे आहेत, अशी वक्तव्य भाजप नेत्यांनी केली होती, हे खोटे आहे का?”, असा सवाल पवार गटाने देवेद्र फडणवीस यांना केला आहे.

“केंद्र सरकारने पोलिस बळाचा वापर करून देशातील शेतकरी आणि कामगारांवर काळे कायदे लादले. मणिपूरमधील हिंसाचारात महिलेची नग्न धिंड काढली जाते. किरीट सोमय्या यांनी भावना गवळी, रवींद्र वायकर, हसन मुश्रीफ अशा महायुतीच्या डझनभर नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, त्यांच्यावरील कारवाईचं काय झालं? राज्यातील वाढती महागाई, बेरोजगारी आणि वाढती गुन्हेगारी या घटनांना तुम्ही फेक नरेटिव्ह म्हणणार का?”, असा सवाल देखील शरद पवार गटाकडून फडणवीस यांना विचारण्यात आला आहे.

“राजकीय स्वार्थासाठी वास्तव गोष्टींना फेक नरेटिव्हचं लेबल लावणं बंद करा. महाराष्ट्रविरोधी, संविधानविरोधी कृत्यांवर कितीही पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला तरी या ढोंगीपणाला महाराष्ट्रातील जनता मुळीच भुलणार नाही. उलट तुमच्या नरेटिव्ह आधारित स्वार्थी राजकारणाला येत्या विधानसभा निवडणुकीत जनता चांगलाच धडा शिकवेल “, असा खरपूस समाचार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने घेतला आहे.