Maharashtra Assembly Election 2024 | मविआ विधानसभेच्या निवडणुकीला मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय सामोरे जाणार?; दिल्लीतील बैठकीत चर्चा

दिल्ली : Maharashtra Assembly Election 2024 | लोकसभा निवडणूक महाविकास आघाडीने एकत्र लढवली. यामध्ये महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठे यश मिळाले. आगामी विधानसभा निवडणुकाही (Vidhan Sabha Election In Maharashtra) मविआ एकत्र लढणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकांच्या जागेचा फॉर्म्युला महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये ठरल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान वरिष्ठ नेत्यांकडून मतदारसंघात लक्ष देण्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांना सूचना केल्याचीही माहिती आहे. मात्र या निवडणुकीआधी मविआ कडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केला जाणार नसल्याची माहिती मिळत आहे.
राज्यातील काँग्रेस नेत्यांची दिल्लीत बैठक पार पडली या बैठकीला मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत विधानसभा निवडणुकी दरम्यान मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवला जाणार नसल्याचं सांगण्यात आल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, पक्षाच्या बैठकीत काँग्रेसच्या काही नेत्यांनी ठाकरेंची शिवसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीबाबत तक्रारी मांडल्या आणि नाराजी जाहीर केली. परंतु यावर फारसं लक्ष न देता पुढे चर्चा करू असं काँग्रेस नेतृत्वानं म्हटलं. भाजपाला हरवणं ही आपल्या सगळ्यांचं प्राधान्य आहे असं राहुल गांधींनी नेत्यांना सूचना केल्या.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मिळालेल्या दमदार यशानंतर काँग्रेसनं विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मंगळवारी दिल्लीत राज्यातील काँग्रेस नेत्यांची वरिष्ठांसोबत बैठक पार पडली. आगामी निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढल्या जातील असं या बैठकीत ठरलं आहे.
त्यानुसार लवकरच मित्रपक्षांसोबत समन्वयासाठी एक समिती बनवा आणि संयुक्त रणनीतीवर काम करा अशा सूचना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना दिल्या आहेत.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan), बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यासह पक्षातील इतर नेते आणि काही नवनियुक्त खासदारही सहभागी होते. या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली.
त्यात मविआतूनच निवडणूक लढवण्यावर काँग्रेस नेतृत्व आग्रही होते. त्याशिवाय माध्यमांसमोर कुठलीही भूमिका मांडताना एका पक्षाची नको तर महाविकास आघाडीची भूमिका असावी असंही नेत्यांना सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्रात आम्ही लोकसभा प्रतिकुल परिस्थितीत लढल्या. जनतेनं मविआला पाठिंबा दिला. महाराष्ट्राला देशातील विकसित आणि समूद्ध राज्य बनवायचं आहे. परंतु भाजपा सरकारने लोकांना महागाई आणि बेरोजगारीच्या संकटात टाकलं.
राज्यातील शेतकऱ्यांवर सर्वात जास्त अन्याय झाला. देशात परिवर्तनाचं चित्र आहे. महाराष्ट्राने याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. आम्ही निवडणुकीच्या तयारीला लागलो आहे असं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी म्हटलं आहे.