Alandi News | आळंदीत लोकसभा निकालानंतर डीजे व फटाके वाजवण्यास बंदी; सोशल मीडियात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास कारवाई

आळंदी : Alandi News | उद्या ४ जूनला लोकसभा निवडणुकीची मतमोजणी (Lok Sabha Election Counting) असणार आहे. या निवडणुकीचा निकाल स्पष्ट होणार आहे. ठिकठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे.
आळंदी शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये या पार्श्वभूमीवर आळंदी पोलिसांनी नागरिकांसाठी नियम बनवलेले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
“संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणूकीचे निकाल मंगळवारी (दि. ४) जाहीर होणार आहे. कोणीही नागरिक सदर निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियाद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप ग्रुप व इतर तत्सम एप्लीकेशनच्या माध्यमांद्वारे कोणत्याही समाजाच्या, जातीच्या, धर्माच्या भावना दुखावतील अशा स्वरूपाच्या पोस्ट, कॉमेंट्स, स्टोरी, स्टेटस, डिजिटल बॅनर असे प्रकार वरील माध्यमांद्वारे करू नयेत. तसेच कोणाचेही विरोधात घोषणाबाजी करू नये” , असे आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी सांगितले.
निकालानंतर डीजे वाजवणार नाहीत, फटाके फोडणार नाहीत. तसेच विनापरवाना विजयी मिरवणूक काढू नये. व्हाट्सअप ग्रुपचे अॅडमिन यांनी दिनांक ३ जून ते दिनांक ६ जून या कालावधीमध्ये त्यांच्या ग्रुपच्या सेटिंगमध्ये ‘ओन्ली ऍडमीन’ असा बदल करून घ्यावा. जेणेकरून ग्रुप मधील कोणताही सदस्य वादग्रस्त पोस्ट ग्रुपवर टाकणार नाहीत.
जर ऍडमीन यांनी सेटिंग मध्ये बदल केला नाही व कोणी सदस्याने वादग्रस्त पोस्ट टाकल्याने काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोस्ट करणाऱ्या सदस्यासह ग्रुप अॅडमीनला जबाबदार धरून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही आळंदी पोलिसांनी दिला आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने दिनांक १० मार्च २०२४ पासून ते दिनांक ६ जून २०२४ पर्यंत आदर्श आचारसंहिता अंमलात असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.