Sharad Pawar On BJP Modi Govt | मोदींच्या नेतृत्वात राज्यातील उद्योग गुजरातला पळवून महाराष्ट्रावर अन्याय, कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवारांची टीका

मुंबई : Sharad Pawar On BJP Modi Govt | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली आणि आशीर्वादाने राज्यातील उद्योग गुजरातला पळवून नेऊन या राज्यावर अन्याय केला जात आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील (Mumbai North East Lok Sabha Constituency) राष्ट्रवादीचे उमेदवार संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) यांच्या प्रचारार्थ कांजूरमार्ग (Kanjurmarg) येथे आयोजित प्रचारसभेत केली. यावेळी खासदार संजय राऊत (Sanjay Raut), खासदार चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, राज्यातील महायुती सरकारला (Mahayuti Govt) सुजलाम महाराष्ट्रातील शेती, उद्योग वाढविण्याची, तरुणांना अधिकाधिक रोजगार देण्याची काळजी नसून राज्यातील उद्याोग गुजरातला कसे जातील याचीच चिंता अधिक असते.
पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकास्त्र डागताना शरद पवार म्हणाले, मोदी हुकूमशाहीच्या दिशेने पावले टाकत आहेत, हे लोकशाहीवरील संकट असल्याने ते रोखावेच लागेल. लोकशाहीचे भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे. लोकशाहीने चालणाऱ्या जगभरातील देशांमध्ये भारताचे स्थान अव्वल आहे. ही लोकशाही संकटात गेल्यास जगातील लोकशाही धोक्यात येऊ शकते. म्हणूनच अमेरिकेसह जगातील अनेक लोकशाहीवादी देशांना भारतातील लोकशाहीचे काय होते याची उत्सुकता आणि चिंता लागली आहे. त्यांचे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.
शरद पवार म्हणाले, आजवरच्या सर्वच पंतप्रधानांनी लोकशाही टिकली पाहिजे, लोकाचे प्रश्न सुटले पाहिजेत अशी भूमिका घेतली. मात्र मोदींनी गेल्या दहा वर्षात याच्या विरूद्ध कारभार केला. लोकांना दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. महागाई नियंत्रणात ठेवली नाही.
दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याची ग्वाही दिली, पण आज देशात बेरोजगारीचे प्रमाण ८७ टक्के आहे. याचाच अर्थ मोदी सांगतात एक आणि करतात एक. दिलेला शब्द कधीच पाळत नाहीत, असा आरोप पवारांनी केला.
महायुती सरकारला फटकारताना शरद पवार म्हणाले, महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांची निर्मिती एकाच वेळी झाली असली तरी येथील सर्व मुख्यमंत्र्यांनी राज्य हिताला प्राधान्य देऊन शेती, उद्योग आदी सर्वच क्षेत्रात राज्याचा नावलौकिक वाढवला. पण विद्यमान सरकारचे राज्याच्या हिताची जपणूक करण्याकडे लक्ष नाही. राज्यातील उद्याोग गुजरातला कसे जातील याचीच त्यांना अधिक काळजी आहे.