मुंबई : एन पी न्यूज 24 – शिवसेनेने आधी भाजपाची लाचारी केली, आता काँग्रेसची लाचारी करत आहे, अशी टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर केली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. दरम्यान, काल शिवसेने याबाबत आपली स्पष्ट आणि आक्रमक भूमिका मांडत काँग्रेसला सुनावले होते.
शिवसेना नेतृत्वाने गेली पाच वर्षे भाजप ची लाचारी केली आता काँग्रेस ची करतायत ,जे मा. बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत ज्यांच्या पोटात आग आहे त्यांनी निर्णय घ्यायचा आहे की लाचारी ची श्रीखंड पुरी खायची की राजसाहेबांना साथ देऊन कष्टाची मीठ भाकर खायची
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) December 15, 2019
संदीप देशपांडे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, शिवसेनेच्या नेतृत्वाने गेली पाच वर्षे भाजपाची लाचारी केली आता काँग्रेसची करत आहे. जे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत ज्यांच्या पोटात आग आहे. त्यांनी निर्णय घ्यायचा आहे की लाचारीची श्रीखंड पुरी खायची की राजसाहेबांना साथ देऊन कष्टाची मीठ भाकर खायची, असे देशपांडे यांनी म्हटले आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे विधान अतिशय निंदनीय आहे.
ते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नखाची सुद्धा बरोबरी करू शकत नाही आणि स्वतःला 'गांधी' समजण्याची घोडचूक तर त्यांनी अजिबात करू नये!
केवळ आडनाव गांधी असल्याने कुणी 'गांधी' होत नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे !— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 14, 2019
राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर शिवसेनेने आपली स्पष्ट आणि आक्रमक भूमिक यापूर्वीच व्यक्त केलेली असताना मनसेने शिवसेनेवर केलेली टीका अनाकलनीय असल्याचे बोलले जात आहे. राहुल गांधींच्या वक्तव्यावर आपली भूमिका स्पष्ट करताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट म्हटले होत की, वीर सावरकर हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे दैवत आहे. सावरकर नावात राष्ट्राभिमान आणि स्वाभिमान आहे. नेहरू , गांधी यांच्या प्रमाणेच सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी जीवनाचा होम केला. अशा प्रत्येक दैवताचा सन्मान करायला हवा. इथे तडजोड नाही. जय हिंद, असे ट्विट राऊत यांनी केले होते.
देशात होत असलेल्या बलात्काराच्या घटनांवर बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना भारतात, मेक इन इंडिया नसून रेप इन इंडिया सुरु असल्याचे म्हटले होते. त्यावरून भाजपाने राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी लोकसभेत केली होती. मात्र, राहुल गांधी यांनी याला स्पष्ट नकार दिला. त्यानंतर दिल्लीतील एका सभेत राहुल गांधी यांनी माझे नाव राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे. सत्य बोललो, त्यासाठी माफी मागणार नाही, असे म्हटले होते. या वक्तव्यावरून हिंदूत्ववादी पक्ष आणि संघटनांनी राहुल गांधींवर जोरदार टीका सुरू केली आहे. आता यामध्ये मनसेची भर पडली आहे.