नागरिकत्व कायद्यात होणार बदल?; शहांनी दिले संकेत

Shah

गिरिडीह (झारखंड) : एन पी न्यूज 24 – मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी या कायद्यात बदल करावेत असे मला म्हटले आहे. संगमा यांनी ख्रिसमसनंतर यासंदर्भात भेट घ्यावी. मेघालयसाठी सर्जनशील पद्धतीने काही उपाय करू शकतो का, याचा विचार केला जाऊ शकतो. कुणालाही या कायद्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे. झारखंडमधील गिरिडीह येथे एका निवडणूक प्रचारसभेत ते बोलत होते. शहा यांचे हे वक्तव्य म्हणजे नागरिकत्व कायद्यात बदलाचे संकेत असल्याचे बोलले जात आहे.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सध्या देशभरात संतप्त पडसाद उमटत आहेत. ईशान्य भारतात उद्रेक झाला आहे. नागरिकत्व कायद्याची आमच्या राज्यात अंमलबजावणी करणार नाही, असे पश्चिम बंगाल, केरळ, पंजाब, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांनी आधीच म्हटले आहे. यामुळे केंद्र सरकार टीकेचे धनी होत आहे. याच पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी नागरिकत्व कायद्यावर आज झारखंडमध्ये काही महत्वाची विधाने केली आहेत.

झारखंडमधील सभेत शहा म्हणाले, नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरुद्ध काँग्रेस पक्षाने हिंसा पसवली. आम्ही नागरिकत्व संशोधन विधेयक आणल्यामुळे काँग्रेस पोटात दुखत आहे. या विरोधात काँग्रेस हिंसा पसरवण्याचे काम करत आहे. या कायद्यामुळे ईशान्य भारतातील संस्कृती, भाषा, सामाजिक ओळख आणि राजकीय अधिकारांवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही.

visit : npnews24.com