गुजरात (गांधीनगर) एन पी न्यूज 24 – गुजरातच्या गोध्रामध्ये २००२ मध्ये रेल्वे जळीतकांडानंतर गठीत करण्यात आलेल्या नानावटी आयोगाच्या अहवालाचा दुसरा भाग आज गुजरात विधानसभेत मांडण्यात आला. यात गुजरातचे तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. आयोगाने सप्टेंबर २००८मध्ये आपला प्रथम अहवाल सादर केला होता.
२७ फेब्रुवारी २००२ रोजी गोध्रामध्ये साबरमती एक्सप्रेसमध्ये ५९ कारसेवकांना जाळल्याची घटना घडल्यानंतर त्याचे भीषण पडसाद उमटले. गुजरातमध्ये दंगल उसळली होती. या दंगलीच्या तपासासाठी ३ मार्च २००२ ला तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधिश जीटी नानावटी यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग स्थापन केला होता. या आयोगाचे न्यायमूर्ती शाह हे दुसरे सदस्य होते. २००९ मध्ये शाह यांच्या मृत्यूनंतर अक्षय मेहता यांना सदस्य करण्यात आले.
सुरूवातीस आयोगाला साबरमती एक्स्प्रेसच्या जळीतकांडासंबंधीची तथ्य आणि घटनांच्या तपासासाचे काम देण्यात आले होते. परंतु, नंतर आयोगाला २००२ मध्ये गोध्राकांडांनतर भडकलेल्या दंगीलींचा तपास करण्यास सांगितले गेले. आयोगाने प्रथम सादर केलेल्या अहवालात साबरमती एक्स्प्रेसच्या सहा डब्ब्यांना आग लावण्याची घटना ही सुनियोजित कटाचा परिणाम असल्याचे म्हटले होते.