नागपूर : एन पी न्यूज 24 – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये अमिताभ बच्चन आणि त्यांच्यात घडलेला एक मजेदार किस्सा काल नागपूरकरांना ऐकवला. नागपूरमधील दक्षिणामूर्ती मंडळाच्या कार्यक्रमात गडकरींनी उपस्थितांना हा किस्सा ऐकवला. यावेळी त्यांनी सांगितले कि, मी एकदा बिग बी अमिताभ बच्चन यांचा फोन कट केला होता. याविषयी अधिक बोलताना त्यांनी सांगितले कि, आधी माझी आणि अमिताभ बच्चन यांची फारशी ओळख नव्हती. त्यावेळी अमिताभ बच्चन यांनी मला फोन केला होता. मात्र कुणीतरी मुद्दाम फोन करून आपल्याला त्रास देत असल्याचे मला वाटले. यामुळे मी फोन कट केला. या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी त्यांचे अनेक किस्से उपस्थित नागरिकांना ऐकवले.
त्यावेळी अमिताभ बच्चन यांचा फोन आला असता, हॅलो, मैं अमिताभ बोल रहा हूँ, असे समोरच्या व्यक्तीने म्हटल्यानंतर कुणीतरी माझी मस्करी करत असल्याचे मला वाटले. यामुळे मी नाटक मत कर, चल फोन रख से म्हणत फोन कट केल्याचे गडकरींनी सांगितले. मात्र त्यानंतर त्यांनी मला पुन्हा फोन लावला आणि मी खरंच अमिताभ बच्चन बोलत असल्याचे सांगितले. त्याचबरोबर महाराष्ट्रातील खाद्यपदार्थांवर देखील त्यांनी मनमोकळे भाष्य केले. यावेळी त्यांनी बिल गेट्स आणि त्यांच्या पत्नी मेलिंडा यांचा देखील एक किस्सा सांगितला. बिल गेट्स आणि त्यांच्या पत्नी मेलिंडा या दिल्लीत भेटीसाठी आले असता माझ्या पत्नीने त्यांच्यासाठी मिसळ पाव केला होता आणि तो त्यांना प्रचंड आवडला देखील होता, असेही गडकरी यांनी सांगितले.
दरम्यान, मराठी पदार्थांवर अधिक भाष्य करताना त्यांनी सांगितले कि, दिल्लीतील अनेक बडे नेते, बॉलीवूड कलाकार मराठी पदार्थ खाण्यासाठी घरी येत असल्याचे देखील यावेळी गडकरींनी सांगितले. नेत्यांविषयी बोलताना त्यांनी सांगितले. सुरेश प्रभू यांनी एकदा माझ्या घरून नेलेल्या रश्यावर जवळपास पाच दिवस ताव मारल्याचे देखील त्यांनी सांगितले. त्याचबरोबर सुषमा स्वराज यांची मुलगी आमच्या घरचे थालीपीठ आवडीने खात असल्याचे देखील त्यांनी सांगितले. सलमान खान याला पोहे अतिशय आवडत असल्याचे देखील त्यांनी सांगितले. त्याचबरोबर हेमामालिनी देखील जेवणाची वेळ विचारून माझ्या घर जेवणासाठी येतात, असेदेखील त्यांनी सांगितले.