डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे शासकीय सिव्हिलमध्ये महिलेचा मृत्यू, सांगली जिल्ह्यात प्रचंड खळबळ

0

सांगली : एनपी न्यूज 24 ऑनलाइन – सांगलीतील वसंतदादा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल) प्रसूतीसाठी आणलेल्या महिलेचा तिच्या गर्भात असणाऱ्या बाळासह मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. श्रीदेवी उत्तम नरळे ( वय २५ ) असे मृत महिलेचे नाव आहे. डॉक्टरांनी महिलेवर वेळीच उपचार न करता तिची प्रसूती केली नसल्याने अर्भक आणि मातेचा मृत्यू झाल्याचा आरोप महिलेच्या कुटुंबीयांनी करत संतप्त झालेल्या नातेवाईकांनी डॉक्टरांवर कारवाई करावी या मागणीसाठी रुग्णालयाच्या बाहेरच गोंधळ घालत ठिय्या मारला होता.

कर्नाळ चौकी परिसरातील राम नगर मध्ये राहणाऱ्या श्रीदेवी नरळे यांना तिसऱ्या अपत्याच्या प्रसूतीसाठी बुधवारी दुपारी सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील शिकाऊ डॉक्टरांनी श्रीदेवी यांच्या सर्व चाचण्या करून घेतल्या. यामध्ये महिलेची नैसर्गिक प्रसूती होईल, असे सांगण्यात आले होते. येथील प्रसूतिगृहात बेड शिल्लक नसल्याने त्यांना ताटकळत ठेवण्यात आले. मात्र, रात्री ८ वाजल्यानंतर महिलेची प्रकृती अचानक बिघडली. त्यावेळी डॉक्टरांनी बाळाच्या छातीचे ठोके वाढल्याने बाळासह आईच्या जीवालाही धोका होईल, असे सांगितले.

मात्र, अचानक रात्री दोनच्या सुमारास महिला आणि नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यामुळे संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी गरोदर महिलेचे सिजरद्वारे प्रसूती करून तिचा जीव वाचवण्याची डॉक्टरांकडे विनंती केली. मात्र डॉक्टरांनी त्यांना तुमच्या आधी दोन सिझरिंगचे पेशंट आहेत तुम्हाला थांबावे लागेल असे सांगितले, काही काळ गेल्यानंतर महिलेची प्रकृती अधिकच खालावल्याने निदर्शनास येताच डॉक्टरांनी तिला अतिदक्षता विभागात दाखल केले. त्यानंतर तब्बल एक तासानंतर बाळासह महिलेचा मृत्यू झाल्याचे कुटुंबियांना सांगण्यात आले.

महिलेसोबत असणाऱ्या कुटुंबीयांनी याची माहिती नातेवाईकांना दिल्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात एकच गर्दी केली. उपचारादरम्यान डॉक्टरांकडून हलगर्जीपणा झाल्याने महिलेचा आणि बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला. सकाळी संतप्त नातेवाईकांनी संबंधित डॉक्टरांवर कारवाईच्या मागणीसाठी रुग्णालयाच्या समोर ठिय्या आंदोलन केले. यामुळे रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी महिलेचे इन कॅमेरा शवविच्छेदन करण्याची भूमिका घेतली आहे. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान महिलेवर उपचारासाठी हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करावी अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा महिलेच्या नातेवाईकांनी घेतला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.